शिवसेनेचे माजी मंत्री, माजी आमदार अनिल राठोड यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन

महाबुलेटीन न्यूज
अहमदनगर : शिवसेना उपनेते, माजी मंत्री, आमदार अनिल राठोड यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना बुधवारी ( दि. ५ ऑगस्ट ) पहाटे त्यांचे निधन झाले.
गेली ३० ते ३५ वर्षे नगर शहराच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या राठोड यांच्या निधनाने शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. सलग पाच वेळा त्यांनी विधानसभेत नगर शहराचे प्रतिनिधित्व केले. नगर शहराला शिवसेनेचा बालेकिल्ला बनवण्यात त्यांनी सिंहाचे योगदान दिले होते. शहराच्या राजकारणावर प्रचंड दबदबा असलेल्या राठोड यांची नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा चेहरा अशी ओळख होती.
त्यांना करोनासंसर्ग झाल्याचे कळल्यावर स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनी करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. शिवसेना व हिंदुत्वाशी कायम एकनिष्ठ राहत त्यांनी राजकारण, समाजकारण केले. सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत. त्यामुळे सलग पाच वेळा नगरची आमदारकी त्यांनी भूषवली. युती सरकारच्या काळात काही काळ त्यांनी राज्यमंत्रीपदही भूषविले होते.
——————
पावभाजीचा स्टॉल ते २५ वर्ष आमदार आणि राज्यमंत्री…असा होता अनिल राठोड यांचा राजकीय प्रवास…
——————-
▪️नगर शहराचा इतिहास असा आहे, की इथं मोठमोठे नेते आमदार झाले; परंतु दोनेपक्षा जास्त वेळा कुणालाही नगरकरांनी स्वीकारलं नाही. दादा कळमकर यांच्यापासून शहरात सामान्यांतून आमदार होण्याची सुरुवात झाली. कळमकर हे हाॅटेलचालक होते. त्यानंतर अनिल राठोड हे पावभाजी गाडीचालक आमदार झाले.
▪️नगरसेवक वा अन्य कोणतंही पदाचा अनुभव नसताना त्यांना थेट आमदार होण्याचं भाग्य मिळालं. नगर जिल्हा सहकाराचा जिल्हा. अशी कोणतीही पार्श्वभूमी नसताना राठोड यांनी जिल्ह्यात शिवसेना रुजवली. वाढवली. चितळेरस्ता परिसरात अगदी साध्या घरात राहणारे अनिलभैय्या अनेकांनी पाहिले आहेत.
▪️शिवसैनिकांसाठीच नाही, तर सामान्यांसाठीही त भैय्याच राहिले. कुणाला राॅकेल मिळालं नाही, कुणाला साखर मिळाली नाही, कुणावर अन्याय झाला, तिथं भैय्या हजर. कुणाशीही कधीही भिडायला तयार. कोणतीही आर्थिक ताकद नसताना त्यांनी नगर शहरावर २५ वर्षे अधिराज्य गाजविलं.
▪️शहरात अनिल भैय्यांचा दरारा होता. नगरची नगरपालिका, नंतर झालेली महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता मिळविली. सामान्यांना नगरसेवक केलं. शिवसेनेवर त्यांची अचल निष्ठा राहिली. सामान्यांच्या पाठिशी भैय्या एखाद्या पहाडाप्रमाणे राहायचे.
▪️त्यामुळं नगरकरांनीही आपली पूर्वीची आमदार बदलाची मानसिकता बदलली आणि भैय्याला सलग पाच वेळा विधानसभेत पाठविलं. कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले, श्रीगोंदे वगळता अन्य कोणत्याही तालुक्यानं एकाच व्यक्तीला पाच वेळा विधानसभेत जाण्याची संधी दिली नाही.
▪️रस्त्यावर भेटणारा, पंचतारांकित संस्कृतीपासून चार हात दूर राहणारा आणि सामान्यांच्या सुखदुःखात आपलंही सुखदुःख मानणारा भैय्या कायमच जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवित राहिला. एखाद्यावर विश्वास ठेवला, की त्यांनी त्याला कधीच दूर केलं नाही. उलट, जे दूर गेले, त्यांना त्यांनी नंतर माफ करून शिवसेनेशी जोडून घेतलं.
* मंत्रिपद असताना आणि लाल दिव्याच्या गाडीतून जाताना त्यांनी जनतेशी नाळ कधीच तुटू दिली नाही. कुणीही हात केला, तरी त्यांची गाडी थांबत असे. सामान्यांचं गा-हाणं ऐकून ते दूर करून नंतरच ते मार्गस्थ होत.
————