महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

महाबुलेटीन न्यूज / ओमप्रकाश तांबोळकर
लातूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर ( वय ९१ ) यांचे आज ( दि. ५ ऑगस्ट ) पहाटे सव्वा दोनच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्यावर निलंगा येथे अंत्यसंस्कार होणार आहे. पाटील यांनी ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ या
९ महिन्यांच्या अल्प कालावधीसाठी महाराष्ट्राचे १० वे मुखमंत्री पद भूषविले.
अखेरच्या श्वासापार्यंत ते काँग्रेस व गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले. १५ जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. १६ जुलै रोजी पुण्यातील रुबी हॉल मध्ये त्यांना पुढील उपचारासाठी दाखल केले होते. मागील तीन दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. मात्र मूत्रपिंड निकामी झाल्याने आज मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. पाटील यांनी कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला हरवून ते खऱ्या अर्थाने योद्धा ठरले. मात्र काळाने अखेर वेळ साधली व दादासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. “दादासाहेब ही पोकळी भरून निघणारच नाही. खऱ्या अर्थाने निलंगा तालुका, लातूर जिल्हा पोरका झाला. कधीही भरून न निघणारी उणीव निर्माण झाली. महाराष्ट्राच्या कोंदणातील कोहिनूर हिरा निखळला”, अशा भावना लातूर करांनी श्रद्धांजली वाहताना व्यक्त केल्या.
———
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर उर्फ ‘दादा’साहेब (१९३१-२०२०) यांचा अल्पपरिचय
————————————————————-
■ माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर राजकारणातील दिगग्ज व्यक्तिमत्त्व. ०९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा इथे त्यांचा जन्म झाला. ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ही होते. एम.ए., एल.एल.बी. पर्यंत त्याचं शिक्षण झालं होतं. ‘दादासाहेब’ या नावाने ते सर्वाना सुपरिचित होते. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदे त्यांनी सांभाळली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकली. ०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६ असे नऊ महिन्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. राज्याच्या राजकारणातील पितामह असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला. गांधी घराण्याशी त्यांची जवळीकता असलेले ते काँग्रेसचे अतिशय निष्ठावंत नेते होते. त्यांच्या निधनामुळे राजकारणात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर लातूर जिल्ह्याने आणखी एक मोठा नेता गमावला आहे. ‘दादा’ या नावाला ते उभ्या आयुष्यात अगदी नावाप्रमाणे जगले…