ग्रामीण भागात गणेश मुर्तीकार अडचणीत
महाबुलेटीन न्यूज / जयेश शहा
मंचर : कोरोनो विषाणु संसर्गाचा परिणाम सार्वजनिक उत्सवावर जाणवु लागला आहे. अवघ्या दोन आठवड्यावर आलेल्या गणेशोत्सवावर कोरोनोचे असलेले सावट, त्यातच गणेशमुर्तीच्या उंचीवर असलेल्या बंधनामुळे मोठ्या आकारातील उंच गणेशमुर्ती तयार करुन तशाच पडुन असल्याने गणेशमुर्तीकार आर्थिक संकटात सापडले आहे. ग्रामिण भागात गणेशमुर्ती कारखान्यातील महीला कारागीरांचा रोजगार गेल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पारगाव, लोणी, धामणी, अवसरी बुद्रुक, गावडेवाडी, अवसरी खुर्द, मंचर, वडगाव काशिंबेग, घोडेगाव, चांडोली, कळंब आदी गावात लहान मोठे गणेशमुर्ती बनविणारे कारखाने आहेत. या कारखान्यांच्या माध्यमातुन काही कारागीरांना वर्षभर रोजगार मिळतो, तर काही कारखान्यात महीला कारगिरांना सहा महीन्यापर्यंत रोजगार मिळतो. मागील काही वर्षापासुन ग्रामिण भागातही मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अगदी १० ते ११ फुट उंची पर्यंत मुर्तींची प्रतीष्ठापणा करतात. सार्वजनिक मंडळे गणेशोत्सवाच्या दोन अडीच महीने अगोदरच गणेश मुर्तींची आगाऊ बुकींग करतात. त्यानंतरच मुर्तीकार मोठ्या आकारातील गणेशमुर्तींचे रंगकाम सुरु करतात.
कोरोनो विषाणु संसर्गाच्या पार्श्वभुमीवर शासनाने गणेशमुर्तींचा उंचीवर बंधने घातली असुन चार फुटा पर्यंतच मुर्तींची प्रतीष्ठापणा करण्यास परवानगी दिली आहे. त्यात मागील पंधरा दिवसापासुन ग्रामिण भागात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक गावे दोन आठवड्यापासुन बंद आहेत. सर्व उद्योग धंदे ठप्प आहेत. त्याचा परिणाम सार्वजनिक उत्सवावर जाणवू लागला आहे. दोन अडीच महीने अगोदर मुर्तींचे बुकींग करणारे मंडळे गणेशोत्सव दोन आठवड्यावर आला असतानाही बुकींग करण्यासाठी येत नाही अशी खंत गावडेवाडी येथील गणेशमुर्तीकार श्रीधर राजगुरु यांनी व्यक्त केली.
श्री. राजगुरु यांच्या कारखान्यात मोठ्या आकाराच्या सुमारे ४० मुर्ती बनवुन तयार आहेत. परंतु शासनाच्या नियमानुसार त्यामुर्तींना मंडाळांची मागणी नसल्याने त्या तशाच पडुन असल्याने श्री. राजगुरु यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आगोदरच्या दिवसापर्यंत चालु असणारे काम यावर्षी एक महीना अगोदरच पुर्ण झाले आहे. काम कमी असल्याने महीला कारागीरांना काम नसल्याने अनेक महीला कारगीरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनो संसर्गामुळे सर्वच गणेशमुर्ती कारखान्यात मोठ्या गणेशमुर्ती तशाच पडुन असल्याने गणेशमुर्तीकार आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे या कारगिरांना शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी आंबेगाव तालुक्यातील जेष्ठ मुर्तीकार बंडेश गांजाळे यांनी केली आहे.
———–