आळंदीत एक गाव एक गणेशोत्सव प्रस्तावास मान्यता
मंडपा विना उत्सव, विसर्जन घर परिसरात करण्याचे आवाहन
महाबुलेटिन न्यूज : अर्जुन मेदनकर
आळंदी : येथील सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी, आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंतर्गत शांतता कमेटी, आळंदी नगरपरिषद पदाधिकारी, नागरिक यांच्यात झालेल्या बैठकीत आळंदीत ‘एक गाव, एक सार्वजनिक गणेशोत्सव’ साजरा करण्याच्या प्रस्तावास मान्याता देण्यात आली.
आळंदीत सार्वजनिक वर्गणी न मागता शहरातील व्यापारी यांना लॉकडाउनने झालेले नुकसानच विचार करून दिलासा देण्याचे आवाहन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसल्याने शांततेत आपापल्या घर परिसरात श्रींचे मूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहनास यावेळी प्रतिसाद देण्यात आला. आळंदी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणा-या गणेश मंडळांचे प्रतिनिधींची बैठक आळंदी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांचे अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, नगरसेवक प्रशांत कुऱ्हाडे, तुषार घुंडरे, प्रकाश कुऱ्हाडे, सागर भोसले, गटनेते पांडुरंग वहिले, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, समीर कुऱ्हाडे, आनंद मुंगसे, विष्णू वाघमारे, भैरवनाथ उत्सव समितीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, रोहनशेठ कुऱ्हाडे, गुप्त वार्ता विभागाचे मच्छिंद्र शेंडे, कर निरीक्षक रामराव खरात यांचेसह गणेश मंडळांचे प्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत एक गाव एक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव भैरवनाथ उत्सव कमेटी व आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने अध्यक्ष शंकराव कुऱ्हाडे पाटील यांनी प्रशासनास दिला. त्यावर उपस्थितांसमोर चर्चा झाली. यास हात वर करून मान्यता देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी यावेळी आवाहन केले. मंदिर असलेल्या गणेश मंडळां शिवाय इतर गणेश मंडळांना यावर्षी परवानगी देण्यात येणार नाही. त्यांनी एक गाव एक गणेशोत्सव उपक्रम हजेरी मारुती मंदिरात होत आहे. त्या ठिकाणी सहभागी व्हावे. ध्वनी प्रदूषण न करता धार्मिक कार्यक्रम साधे पणाने तसेच आरोग्य दायी प्रबोधन करणारे उपक्रम राबविण्यास आवाहन करण्यात आले. गणेश विसर्जन मिरवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही. कोरोनाचे पार्शवभूमीवर आळंदी नदी घाट बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदी इंद्रायणी नदी घाटावर विसर्जनास गर्दी न करता आपापल्या घर परिसरात श्रींचे विसर्जन करावे, तसेच आळंदी पंचक्रोशीतील गावानी आळंदीत श्रींचे विसर्जनास येऊ नये, आपापल्या गावातच श्रींचे विसर्जन करावे अशा सूचना देत यास मान्यता देण्यात आली. आळंदीतील एक गाव एक गणेशोत्सव उपक्रम स्तुत्य असून यास आळंदी नगरपरिषद आवश्यक ते सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली. कोरोना ग्रस्त होऊन निधन झालेल्या आळंदीतील नागरिकांना या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करून पसायदानाने बैठकीची सांगता झाली.