खेड तहसीलदार बदली प्रकरण : “महाआघाडी” कोणाच्या पारड्यात टाकणार वजन ?
महाबुलेटिन नेटवर्क : प्रतिनिधी
राजगुरुनगर : खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या पतीपासून जीवाला धोका असल्याची तक्रार आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी रविवारी ( दि ९ ऑगस्ट ) थेट राजगुरूनगर पोलीस ठाण्यात केली. आमदार मोहिते यांनी तहसीलदार आमले व त्यांच्या पतीवर विविध आरोप केले असून या प्रकरणाची शहानिशा करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी दिले आहे.
एका अधिकाऱ्याच्या विरोधात आमदारांनी अशी भूमिका घेतल्याने तहसीलदारांच्या बदलीच्या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. तहसीलदारांच्या विरोधातील वाढलेल्या तक्रारी, कथित गैरकारभार आणि बदली प्रकरणाची किनार या घटनेला असावी, असे मत व्यक्त होत असताना माजी आमदार सुरेश गोरे यांनी तहसीलदार सुचित्रा आमले यांचे काम चांगले असल्याचे राजगुरूनगर येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यामुळे तालुक्याचे राजकारण चांगलेच तापले असून तहसीलदारांची बदली हा आजी-माजी आमदारांच्या प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.
काय घडतेय ?
* खेडच्या तहसीलदार सौ. सुचित्रा बाळासाहेब आमले यांची बदली होणार आहे. बदली होऊ नये यासाठी तहसीलदार समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच
इतर विविध माध्यमांतून माझी बदनामी करीत असल्याचा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा आरोप आहे.
* उपमुख्यमंत्री अजित पवार खेडला आलेले असताना तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी सुचित्रा आमले यांच्या बदलीची मागणी केली होती.
* काही संस्थांनी तहसीलदार सुचित्रा आमले यांचे काम चांगले असून त्यांची बदली होऊ नये, अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला होता.
अशा पार्श्वभूमीवर आमदार दिलीप मोहिते यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, तहसीलदार आमले यांचे पती बाळासाहेब आमले यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. आपल्या जीवास बरेवाईट झाल्यास त्यांना जबाबदार धरावे व आपणास पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी आमदार मोहिते यांनी केली आहे.
या प्रकरणात माजी आमदार सुरेश गोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला. तहसीलदार सुचित्रा आमले यांचे काम चांगले आहे. बदली करण्यासाठी सध्याचे आमदार प्रयत्नशील असून हे काम प्रशासनाचे आहे. त्यांचे आमले यांच्यावरील आरोप चुकीचे, बिनबुडाचे व हास्यास्पद असून कोण कोणास दमबाजी करतेय, हा खरा प्रश्न आहे. आत्ताच्या तहसीलदार चांगल्या असून त्यांनी माझ्या कार्यकाळात, तसेच सध्याच्या कोरोनाच्या कालावधीतही चांगले काम केले आहे. कार्यकाळ संपल्याशिवाय बदली करता येत नाही.
या संदर्भात खेड च्या तहसीलदार सुचित्रा आमले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. एकंदरीत या प्रकरणात आजी-माजी आमदारांनी उडी घेतल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. आता या बदली प्रकरणात महाआघाडी कोणाच्या पारड्यात वजन टाकणार हा चर्चेचा विषय ठरला आहे.