अधिकाऱ्यांनी राजकारणात न पडता लोकसेवक म्हणून उत्तरदायित्व निभवावे : ॲड. सोमनाथ दौंडकर
अधिकाऱ्यांनी राजकारणात न पडता लोकसेवक म्हणून उत्तरदायित्व निभवावे : ॲड. सोमनाथ दौंडकर
महाबुलेटिन नेटवर्क। शिवाजी आतकरी
राजगुरूनगर : खेड तहसीलदारांवरून निर्माण झालेले वादंग शांत होण्याची चिन्हे दिसेनात. एकूण परिस्थितीवरून एक तर बदली किंवा मोठा संघर्ष यापैकी एक अटळ आहे. अधिकाऱ्यांनी मुजोरपणा न करता लोकप्रतिनिधींची मानमर्यादा ठेवून लोकाभिमुख कामांवर लक्ष केंद्रित करावे. राजकारण करायला तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी समर्थ आहे. त्यात अधिकाऱ्यांनी लक्ष न देता जनतेला वेठीस न धरता कामे करावीत, असे पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. सोमनाथ दौंडकर यांनी कोणाचेही नाव न घेता सुनावले.
जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष यांनी तालुक्यातील तहसीलदार प्रकरणात आपली प्रतिक्रिया नोंदवली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि आता काँग्रेसही या प्रकरणात सामील झाले आहे. पक्षीय कल लक्षात घेता या विषयावरून शिवसेनेत फूट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेशी काँग्रेसची भूमिका मिळतीजुळती आहे. एकूणच खेड तहसीलदार यांच्यामुळे खेडचे राजकारण ढवळून निघाले आहे.
याप्रकरणी ॲड. सोमनाथ दौंडकर यांना विचारले असता ते म्हणाले, कोरोनाचे संकट गंभीर आहे. अधिकाऱ्यांनी याबाबत राबविण्यात येणाऱ्या यंत्रणेवर लक्ष देणे अत्यावश्यक आहे. अधिकारी राबवित असलेली यंत्रणा कुचकामी ठरत आहे. जनतेचा विश्वास त्यामुळे उडत चालला आहे. दुसऱ्या बाजूला तहसील कार्यालयाबद्दल बोलायचे झाल्यास लोकांची कामे होत नाही, अडवणूक होते. मोठ्या आर्थिक व्यवहाराची गणिते येथे चालतात. गौण खनिज उत्खनन यातून शासनाचे करोडोंचे नुकसान होत आहे. येथे येणारा माणूस कामासाठी वेठीस धरला जात आहे. सातबारा दुरुस्तीसारखी हजारो प्रकरणे का प्रलंबित आहेत, असा सवाल दौंडकर यांनी केला.
तालुक्यातील तहसीलदारांसह सर्वच अधिकाऱ्यांनी आपण लोकसेवक आहोत हे ध्यानात ठेवावे. राजकारणात नाक खुपसू नये. लोकप्रतिनिधींची मानमर्यादा ठेवा, अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला.
चांगले काम करणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांना खेड तालुक्याने डोक्यावर घेतले आहे आणि जनतेला वेठीस धरणाऱ्यांना ठणकावले आहे, हे संबंधितांनी लक्षात ठेवावे.
# आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या भूमिकेविषयी…
—————————————————
आमदारांनी काय तक्रार दाखल केली, याबद्दल मला बोलायचे नाही. जनतेची कामे तहसील कार्यालयातून होत नाही, लोकांना वेठीस धरले जाते, गौण खनिजांची राजरोस चोरी होते, कोरोना वाढला, प्रभावी यंत्रणा राबवली जात नाही इत्यादी आरोप जे आमदारांनी केले त्यात तथ्य आहे.
# तहसीलदार आमले यांच्या बदलीविषयी…
————————————————–
कामकाजात सुधारणा व्हावी. ज्यांनी चांगले काम केले त्यांनी बिगरवादग्रस्त राहून कार्यकाळ पूर्ण केला. बदलीची बाब प्रशासकीय आहे.
# शिवसेनेच्या व त्यांच्यातील मतांतर आणि भूमिकेविषयी...
———————————————–
खरे तर लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी भूमिका घ्यावी. जनतेचच्या सोयीसाठी आग्रही असावे. शिवसेना व त्यांच्या नेत्यांनी घेतलेली भूमिका याबद्दल मी बोलणे योग्य नाही.
# काय म्हणाले ॲड. सोमनाथ दौंडकर…
———-–———————————
* अधिकाऱ्यांनी राजकारण करू नये
* लोकप्रतिनिधींची मानमर्यादा पाळावी
* लोकाभिमुख कामे करावी
* गैरकारभार थांबवावा
* लोकसेवक अशी भूमिका ठेवावी.
———–