खेडविशेषसामाजिक

झाडांच्या संगोपनासाठी रानमळ्यात ‘बिहार पॅटर्न’

महाबुलेटीन नेटवर्क / मिलिंद शिंदे 
कडुस : रानमळा ( ता.खेड, जि .पुणे ) येथे ‘संरक्षण तुमचं,
संगोपन आमचं’ या अभिनव संकल्पनेतून 200 झाडांचे  वृक्षारोपण करण्यात आले. ही सर्व झाडे  गावातील रस्त्यांच्या दुतर्फा लावली आहेत. या झाडांचे संरक्षणासाठी दर्जेदार आणि भक्कम 200 लोंखंडी ट्री गार्डस ( पिंजरे ) समाजातील
पर्यावरण प्रेमी दानशूर व्यक्ती व संस्था यांचेकडून रानमळा ग्रामस्थांना देणगीरूपाने मिळाले आहेत.
एका ट्री गार्डची किंमत 1100 रुपये आहे. प्रत्येक ट्री गार्डवर त्या देणगीदाराचे नाव टाकण्यात आले आहे. सदरच्या देणगीदारांच्या झाडांचे संगोपन महाराष्ट्र शासनाच्या ‘बिहार पॅटर्न’ या योजनेतून वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली  ग्रामपंचायत व  संयुक्त वन व्यस्थापन समिती आणि रानमळा ग्रामस्थ या झाडांचे संगोपन करणार आहेत. सिल्व्हरओक, कडुलिंब, आवळा, जांभुळ, चिंच इत्यादी 200 झाडे लावली आहेत. रोपांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून नंतर वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणांनंतर ट्री गार्ड लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला.
कोरोना संसर्गाच्या धोक्याचा विचार लक्षात घेऊन अनेक लोकांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी तोंडाला मास्क लावून व दोन व्यक्तींमध्ये आवश्यक ते विशिष्ट अंतर ठेऊन वृक्षारोपण करण्यात आले.
या झाडांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी देणगी दिलेल्या देणदीदारांचे संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. पी. टी. शिंदे यांनी स्वागत केले. या प्रसंगी राजगुरूनगर बँकेचे संचालक सतीश नाईकरे म्हणाले,” रानमळा गावाचा वृक्षसंवर्धनाचा हा आदर्श इतरांनी घ्यायला पाहिजे. झाडे लावतानाच त्यांच्या संगोपनाबरोबर  संरक्षणासाठी  भक्कम आणि मजबूत ट्री गार्डस देणगी रूपाने मिळवल्याबद्दल ग्रामस्थांचे  अभिनंदन केले. राजन जांभळे, लक्ष्मण नाणेकर गुरुजी मनोगत व्यक्त करताना म्हणाले ,” या गावातील वृक्ष संवर्धनाच्या कामाबद्दल ग्रामस्थांचे कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. या गावातील लोकांचे वृक्ष संवर्धनाचे काम अतिशय स्तुत्य आहे. म्हणून आम्ही आमच्या चाकण गावातील महावीर पतसंस्थेकडून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.” राजगुरूनगर वन परिक्षेत्र अधिकारी आशुतोष शेडगे आपले विचार मांडताना म्हणाले, “योगायोग म्हणजे गेल्या वर्षी मी याच महिन्यात या तालुक्यात नव्याने आलो. या गावातील ग्रामस्थांच्या वृक्ष संवर्धानाच्या कामामुळे या गावाने आगळी वेगळी ओळख निर्माण केली  आहे.” बी. बी. गवते ( सेवा निवृत्त वन परिक्षेत्र अधिकारी ) ए. एच. सोनवणे (मंडल अधिकारी, कडूस ) यांनी मनोगत व्यक्त केले. सर्व मान्यवरांनी रानमळा ग्रामस्थांच्या वृक्षसंवर्धनाच्या कामाची प्रशंसा केली. “गेली 25 वर्षे या कामामध्ये सातत्य ठेवल्याने गावाचा लौकिक देशभर झाला आहे म्हणून ग्रामस्थांचे अभिनंदन केले. ग्रामस्थांच्या लोकसहभागायामुळे या गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत, त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांनी ग्रामस्थांचे भरभरून कौतुक केले.
यावेळी महावीर नागरी पतसंस्थेचे चेअरमन वसंतराव कड, संचालक बाळासाहेब मांजरे, ह. भ. प. मुक्ताजी नाणेकर, तलाठी बी. एस. राठोड, वनपाल सपकाळ मॅडम, सरंपच ताराबाई शिंदे, मा.सरंपच गेनभाऊ भुजबळ, यादवराव शिंदे, मा. उपसरपंच शंकर शिंदे, मोहन सुकाळे, चेअरमन बाजीराव शिंदे, नवनाथ थोरात, माउली भुजबळ, सुनंदा ढमाले, कविता जाधव, ग्रामसेविका डोंगरे मॅडम व  ग्रामस्थ उपस्थित होते.
रानमळा शाळेचे शिक्षक बाबाजी शिंदे व सलीम शेख यांनी सूत्रसंचालन केले. तर जि .रं .शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!