यंदा सरपंचांच्या हस्ते झेंडावंदन नाही
यंदाच्या झेंडावंदनाचे ‘हे’ असतील मानकरी
महाबुलेटिन न्यूज / किशोर कराळे
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करण्याबाबत शासनाने आदेश काढले असून यावर्षी प्रशासकाच्या हस्ते झंडावंदन होणार आहे. गावात प्रशासक नियुक्ती झाली नसेल व प्रशासकाकडे एकापेक्षा जास्त गावांचा कार्यभार असल्यास पुढील मान्यवरांकडून झेंडावंदन करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाचे उपसचिव एकनाथ गागरे यांनी दिले आहेत.
राज्यातील कोविड १९ आजाराच्या प्रादुर्भावामुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ न शकल्यामुळे सदर ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आली आहे. भारताचा ७४ वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी होत असून ध्वज संहितेनुसार दरवर्षी गावागावात सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे निवडणूक आयोगाने डिसेंबर २०२० अखेर पर्यंत १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याचे कळविले आहे.
कोण असतील ध्वजारोहणाचे मानकरी ?
—————————————
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी एकापेक्षा जास्त कार्यभार असणाऱ्या प्रशासकांनी गावाची निवड करून त्या ठिकाणी ध्वजारोहण करावे. उर्वरित गावांमध्ये पुढील मान्यवरांनी ध्वजारोहण करावे.
# स्वातंत्र्यसैनिक असेल व झेंडावंदन करण्यासाठी त्यांची तब्येत उत्तम असेल तर त्त्यांना प्राधान्य राहील.
# स्वातंत्र्यसैनिक नसतील तर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष
# तंटामुक्ती अध्यक्ष पद रिक असेल तर ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी
# वरील तीन पैकी शक्य न झाल्यास गटविकास अधिकारी ( बीडीओ ) यांनी झेंडावंदन साठी एखाद्या शासकीय अधिकाऱ्यास नियुक्त करावे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याबाबतचे नियोजन करून कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा कोविड १९ संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडण्याबाबत दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.