कोरोनामुळे यंदा पित्राला निमंत्रण नाही…
यंदा खराबवाडीत पित्राला निमंत्रण नाही : ग्रामस्थांचा निर्णय…
गावात पाडला चांगला पायंडा, इतर गावांनी आदर्श घ्यावा : प्रकाश खराबी
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क : हनुमंत देवकर
सर्व ग्रामस्थांना नम्र विनंती करण्यात येते की, बुधवार दि. २ सप्टेंबर पासून पितृपंधरवडा सुरू झाला असून आपण सर्वजण पित्राच्या कार्यक्रमाचे आयोजन करतो. परंपरेनुसार आपल्या भावकीतील, वाड्यातील चार महिला स्वंयंपाकाला येतात. आपण आपले आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रमंडळी, भावकीतील मंडळींना जेवणासाठी बोलवतो व यातून निश्चितपणे आपल्याला समाधानही मिळते, मात्र सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता आपणा सर्वांना अगदी कळकळीने विनंती करण्यात येते की, आपले निश्चितपणे सर्वांवरती प्रेम आहे. आपण काळजी घेऊन सुरक्षित राहण्यासाठी आपण या वर्षी कोणालाही जेवायला बोलावू नये. कोणालाही राग येणार नाही. सर्वजण समजून घेतील. हा उत्सव, आपली परंपरा कुटुंबा पुरतीच मर्यादित ठेवावी, ही नम्र विनंती.
आपण चार लोकांना बोलाविले तर सर्वच लोक येतील की नाही याबद्दल शंका आहे, तर एखाद्याची इच्छा नसतानाही केवळ आपल्या प्रेमामुळे त्याला आपल्याकडे यावे लागेल व याच्यातून चुकून जर कोरोना संसर्ग एखाद्या व्यक्तीला झालाच, तर आपल्या सर्वांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल.
त्यामुळे यंदा निमंत्रण नको….
काळजी घ्या, निरोगी राहा, सुरक्षित राहा….
असे गावातील ग्रुपवर सर्व ग्रामस्थांना कळविण्यात आले आहे.
मागील वर्षी गावाने एकत्र भरणी श्राद्ध घालून इतर गावांपुढे वेगळा आदर्श ठेवला होता, मात्र यावर्षी कोरोनाच्या महामारी मुळे असा कार्यक्रम करता येणार नाही. तसेच मागील वर्षी गावाने निमंत्रण पत्रिका न छापता विवाह सोहळे करण्याचा चांगला निर्णय घेतला होता. यावर्षी मर्यादित लोकांमध्ये विवाह समारंभ पार पाडले, त्यापाठोपाठ यावर्षी पित्राला निमंत्रण व देण्याचा गावाने निर्णय घेतला असून कोरोनाची साखळी रोखण्यासाठी हा कार्यक्रम कौटुंबिक स्वरूपाचा करण्याची विनंती करण्यात आली आहे. – प्रकाश खराबी ( माजी उपसरपंच )