भांबोलीचा रस्ता गेला पाण्यात, पीडब्ल्यूडीचे दुर्लक्ष
सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
शिंदे-वासुली ( दत्ता घुले ) : सार्वजनिक बांधकाम विभागाचा चाकण – वांद्रा या मुख्य रस्त्यावर भांबोली ग्रामपंचायत हद्दीत मुख्य बाजारपेठ असलेला भांबोली फाटा ते वासुली फाटा हा २०० ते ३०० मिटरचा रस्ता संबंधित विभागाच्या गलथानपणामुळे पुन्हा एकदा पाण्यात गेला आहे.
या रस्त्यावर पाणी आणि चिखलमातीचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनचालक बेहाल झाले आहेत. रस्त्यावरील गुडघाभर पाणी व चिखलामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेले व्यावसायिक, स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
भांबोली फाटा व वासुलीफाटा ही चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील मुख्य बाजारपेठ असून हा दळणवळणाचा मुख्य मार्ग असल्याने हा रस्ता सतत गजबजलेला असतो. सध्या गणेशोत्सवाचे दिवस असल्याने तसेच दुकानांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. याशिवाय औद्योगिकिकरणामुळे फाट्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध वस्तूंची दुकाने व भाजीपाल्याचे छत्रपती शिवाजी मार्केट आहे. त्यामुळे इथे नागरिकांची व वाहनांची सतत वर्दळ असते.
येथील स्थानिक जागा मालकांनी दोन्ही बाजूला व्यापारी गाळे उघडले असून हे गाळे मुरुमाचा भराव टाकून मुख्य रस्त्यापासून अधिक उंचीवर असल्याने रस्त्याला खोलगटपणा आलेला आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी संबंधित विभागाकडून योग्य व्यवस्थापन केले गेले नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. उन्हाळ्यात रस्त्यावर खड्ड्याची चाळण, दगड गोटे व धूळमातीमुळे सर्वांना शारीरिक आजाराला सामोरे जावे लागत आहे. तर पावसाळ्यात रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून रस्त्याचे अक्षरशः तळे झाले आहे. रस्त्याला ना साईड गटर, ना पाणी वाहून जाण्यासाठी मोरी. त्यामुळे चोहोबाजूंनी पाणी रस्त्यावर येऊन साचून राहते. घाण, चिखल मातीमुळे स्थानिक रहिवासी, प्रवाशी, व्यावसायिक व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
चाकण एमआयडीसीची अवजड व कामगार वाहतूक जवळचा व सुलभ मार्ग म्हणून याच रस्त्याने होत असते. एमआयडीसी परिसरात सुसज्ज व विस्तारीत रस्ते असताना मात्र भांबोलीफाटा ते वासुलीफाटा ते भामचंद्र हायस्कूल पर्यंतचा रस्ता दूर्क्षितच राहिला आहे असून काहीतरी प्रशासकीय अडचणी सांगून वेळकाढूपणा करीत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग स्थानिक ग्रामपंचायत व एमआयडीसी वर खापर फोडून मोकळे होतात.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील प्रमुख जिल्हा मार्गाचा भाग आहे. परंतु एमआयडीसी परिसरातील वराळे, भांबोली, सावरदरी, खालूंब्रे, शिंदे व वासुली ही गावे एमआयडीसी बाधीत असून येथील रस्ता दुरुस्ती व रस्ताविषयक अन्य कामे औद्योगिक विभागाने करायला हवीत अशी अटकळ बांधून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.
येथील भांबोली ग्रामपंचायत व स्थानिक व्यावसायिकांनी वेळोवेळी उन्हाळा पावसाळा मुरुमाने रस्त्यावरील खड्डे भरुन घेतात. परंतु या रस्त्याचे कायमस्वरूपी काम होणे गरजेचे असून ग्रामपंचायत दोन्ही विभागाशी संपर्क साधून रस्त्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
दरम्यान खेड तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून विशेषतः चाकण एमआयडीसीच्या कामगारांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. रस्त्यावरील साठलेल्या पाण्यामुळे या भीषण काळात विविध साथीच्या रोगांना आमंत्रण दिले जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम व औद्योगिक विभागाने या रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.
भांबोली ग्रामपंचायतचे सरपंच भरत लांडगे यांनी रस्त्याच्या कामासाठी ग्रामपंचायत पातळीवर सहकार्य करावयास तयार असून इच्छा असतानाही ग्रामपंचायत माध्यमातून अनेक प्रशासकीय अडचणींमुळे काम करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. येथील उद्योजक जालिंदर राऊत यांनीही व्यावसायिकांच्या वतीने सहकार्याची भूमिका घेतली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व एमआयडीसी प्रशासन यांनी सुवर्णमध्य काढून तातडीने रस्ता दुरुस्त केला नाही, तर चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
——————————
वासुुली फाटा रस्ता म्हणजे रस्त्यावर पाणी, की पाण्यात रस्ता आहे हे समजत नाही. एमआयडीसी व येथील बाजारपेठेमुळे या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते. अनेक वाहनातील इंजीनमध्ये पाणी जाऊन गाड्या नादूरुस्त झाल्या आहेत. तसेच साठलेल्या दुषित पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्र्न निर्माण होऊ शकतात. काम कोणीही करा पण रस्ता दूरुस्त करा.
— सुरेश पिंगळे देशमुख – एक उद्योजक
