यंदा आळंदीत इंद्रायणी नदी घाट गणेश विसर्जनास बंद
यंदा आळंदीत इंद्रायणी नदी घाट गणेश विसर्जनास बंद,
आळंदीत ‘एक गाव, एक सार्वजनिक गणेशोत्सव’
पोलीस बंदोबस्त तैनात रहाणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय
महाबुलेटीन न्यूज / अर्जुन मेदनकर
आळंदी / प्रतिनिधी : येथील सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी, आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंतर्गत शांतता कमेटी, आळंदी नगरपरिषद पदाधिकारी, नागरिक यांचेत झालेल्या बैठकीत आळंदीत ‘एक गाव, एक सार्वजनिक गणेशोत्सव’ साजरा करण्याचे ठरले. यावेळी बैठकीत इंद्रायणी नदी घाटावर गणेश विसर्जनास बंदी घालण्याचा निर्णय झाला. त्या प्रमाणे पोलिस प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी केली आहे .
या मागणीसाठी तात्काळ कामकाज होवून जनजागृती व्हावी यासाठी आळंदीतील पदाधिकारी नागरिकांनी पुणे शहर पोलीस आयुक्त संदीप बिष्णोइ, पुणे ग्रामीण पोलिस, पिंपरी चिंचवड पोलिस अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर माई ढोरे यांना आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक प्रकाश कु-हाडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, भैरवनाथ उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कु-हाडे, जालिंदर महाराज भोसले उपस्थित होते. आळंदी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते पुणे पोलिस आयुक्त संदीप बिश्नोई यांचेसह मान्यवरांचे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रत देवून आळंदीकरांचे वतीने सत्कार करण्यात आला.
आळंदीत गणेश स्थापना दिन व विसर्जन दिनी मिरवणुकींना बंदी घालण्यात आली आहे. कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे उपाय योजनेचा भाग म्हणून यावर्षी आळंदी मधील इंद्रायणी नदी घाटावर प्रवेशावर मर्यादा आणून गणेश विसर्जन नदीत करण्यास बंदी करण्यात आली आहे.
गणेश भक्त नागरिकांनी शांततेत आपापल्या घर परिसरात श्रींचे मूर्तीचे विसर्जन हौदयात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आळंदी पंचक्रोशीतील सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी आपआपल्या गावात घरी प्रशासनाचे सुचना प्रमाणे गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.
आळंदीत गणेश विसर्जनास बंदी असल्याने येवू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी आळंदी पदाधिकारी यांनी केली आहे. आळंदी पंचक्रोशीतील गावे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील गावांतून आळंदीत गणेश विसर्जनास येवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
आळंदीतील ‘एक गाव, एक गणेशोत्सव’ उपक्रम स्तुत्य असून यास आळंदी नगरपरिषद आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.