उद्यापासून शहरात सर्व दुकाने सात तास सुरु रहाणार
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
महाबुलेटिन नेटवर्क। प्रतिनिधी
इंदापूर : कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी उद्यापासून शहरातील सर्व दुकानदारांनी सामाजिक अंतर पाळत,मास्क व सॅनिटायझरचा कटाक्षाने वापर करत उद्यापासून (दि.७) सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरु ठेवावीत असा निर्णय आज झालेल्या व्यापारी संघटनेच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत जावून ९१ वर पोहोचली आहे. जवळपास निम्म्या शहराच्या वेगवेगळ्या भागात कोरोना पोहोचला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत शहा ब्रदर्स अँड कंपनीच्या फर्मपासून भंडारी यांच्यापर्यंतचा भाग व मंडई लगतचा परिसर चौदा दिवसांसाठी सील करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या नियंत्रणासाठी शहर बंद ठेवण्याच्या मुद्द्यावर शहरात मतभिन्नता होती.
दुकाने बंद ठेवण्याचा व कोरोनाच्या वाढीचा काहीएक संबंध नाही. गर्दीची ठिकाणे,लग्न समारंभ,अंत्यविधी या ठिकाणी लोक सामाजिक अंतराचा नियम पाळत नाहीत,त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सर्दी तापासारखे आजार काढले जातात. तातडीने तपासणी होत नाही,दुखणे बळावल्यानंतर लोक स्वतःसह कुटुंबाला संकटात टाकतात. त्या ऐवजी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन कोरोनावर नियंत्रण आणावे, असे मत माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी मांडले आहे.
शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकाने बंद न ठेवता,पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातून येथे होणारी ये जा बंद करावी. पोलीस व नगरपरिषदेच्या प्रशासनाने त्यासाठी कठोर उपाय योजावेत, असे मत मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राहुल गुंडेकर यांनी मांडले होते.
मुख्य बाजारपेठ बंद केल्यानंतर व्यापारी व सामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होते,याचा अनुभव गेल्या चार महिन्यात सर्वांनीच घेतला होता. मरगळलेल्या उलाढालीला ऊस उत्पादकांना कारखान्याकडून मिळालेल्या बीलांमुळे काही प्रमाणात संजीवनी मिळाली होती. या पार्श्वभूमीवर बाजारपेठ बंद करण्याचा उपाय महाग पडेल असा ही मतप्रवाह होता. मात्र व्यापारी संघटनेने उपरोक्त निर्णय घेतल्याने सर्वच घटकांनी नि:श्वास सोडला आहे.
दरम्यान,इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील विविध भागात जंतुनाशकाची फवारणी करण्यात येत आहे.