खेडशैक्षणिक

श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश इयत्ता १० वीचा 100% निकाल

महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
आळंदी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इ. 10  वी च्या परीक्षेचा निकाल बुधवार दिनांक 29 जुलै रोजी जाहीर झाला. शाळेच्या 67 वर्षाच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे की इयत्ता 10 वीचा 100% निकाल
(शैक्षणिक वर्ष 2019 – 20 चा) लागला असून तालुक्यात सर्वात मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांत आज श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज हे प्रथम क्रमांकावर आहे. संस्था पदाधिकाऱ्यांपासून ते प्रशालेच्या शेवटच्या घटकाने इ. 10 वी चा 100% निकाल लावायचा हे स्वप्न ४ वर्षांपूर्वी उराशी बाळगले होते. त्यानुसार संस्थेच्या सर्व घटकांच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. शिक्षकांचे अध्यापन, परिश्रम व प्रयत्न तसेच विद्यार्थ्यांची जिद्द, अभ्यास व चिकाटी त्याचे फळ म्हणजे श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज आळंदी देवाची प्रशालेचा इ 10 वी चा 100% निकाल लावत विद्यार्थ्यांनी यशाचे सर्वोच्च शिखर गाठले.
प्रशालेतील एकूण 386 विद्यार्थी एस. एस. सी परीक्षेस प्रविष्ट झालेले असून पैकी 132 विद्यार्थी  डिस्टींक्शन, 157 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 93 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 04 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणी प्राप्त ठरले.
प्रशालेचा निकाल 100% लागला असून प्रथम क्रमांक कुमारी उर्वी रविकांत राऊत 96.80%, द्वितीय क्रमांक  कुमारी अश्विनी पुंजाजी पजई 96.20% तर तृतीय क्रमांक कुमार पार्थ निळोबाराय शिंदे 96.00% गुण प्राप्त करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याचप्रमाणे विद्यालयातील दिव्यांग (अंध) युनिटचा निकाल परंपरागत याही वर्षी100% लागला. यामध्ये प्रथम क्रमांक तेजस्विनी दहातोंडे 89.80%, द्वितीय क्रमांक प्राजक्ता तामकर 88.20% तर तृतीय क्रमांक रुपाली गवळी 87.20%  गुण प्राप्त केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, सतत प्रयत्नशील असणारा गुणवत्ता विभाग, त्या अंतर्गत उपक्रमशील गुणवत्तावाढ समिती, समितीचे पर्यवेक्षक सुर्यकांत मुंगसे, समन्वयक अनिता गावडे तसेच त्यांच्या समवेत अविरत प्रयत्न करणारे सर्व वर्गशिक्षक, विषयशिक्षक, मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक दिपक मुंगसे, माजी मुख्याध्यापक गोविंद यादव, यांचे संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, सचिव अजित वडगांवकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, ज्येष्ठ विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे व इतर सर्व विश्वस्त, सदस्य व पालक यांनी भरभरून  अभिनंदन केले. याप्रसंगी बोलताना संस्थेचे सचिव अजित वडगांवकर म्हणाले की, संस्थेच्या इतिहासामध्ये एसएससी बोर्डमध्ये शाळेचा निकाल प्रथमच १००% लागला. तालुक्यातील मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये तालुक्यात आज ज्ञानेश्वर विद्यालय एक नंबरला आले म्हणजेच सर्वाधिक 100% निकाल लागला. या दोन्ही गोष्टी घडल्याचा विशेष आनंद होत आहे. ज्या शाळांचा निकाल 100% लागतो त्या शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देताना संख्या मर्यादित असते, विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिली जाते तर पालकांचा आर्थिक स्तर पाहिला जातो व ते कोणत्या विभागातून आले आहेत हे सर्व पाहिले जाते. प्रसंगी विद्यार्थ्याबरोबरच पालकांच्या सुद्धा मुलाखती घेतल्या जातात. परंतु आपल्या या श्री ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये प्रवेश देताना अशा प्रकारचे कुठलेच निकष लावले जात नाहीत. तसेच महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातून येऊन गरीब शेतकऱ्यांची, वारकरी संप्रदायातील मुले येथे प्रवेश घेत असतात अशा परिस्थितीमध्ये 100% निकाल लावणे म्हणजे दिवास्वप्न असते. परंतु शिक्षकांमध्ये असलेली जिद्द व संत विचारांवर असलेला संस्थेचा दृढ विश्वास “करील ते काय नोहे महाराज” किंवा “असाध्य ते साध्य करिता सायास l कारण अभ्यास तुका म्हणे ll” यामुळे हे शक्य झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!