सोनाई कारखाना दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार : प्रवीण माने
महाबुलेटीन न्यूज / प्रतिनिधी
इंदापूर : यंदाच्या गळीत हंगामात सोनाई कृषी प्रक्रिया कारखाना दीड लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी आज ( दि.२ ) दिली.
यंदाच्या गाळप हंगामासाठी सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याच्या रोलर पूजनाचा समारंभ प्रवीण माने यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “सोनाई परिवाराचे संस्थापक दशरथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा कारखान्याचा चौदावा गाळप हंगाम सुरु होत आहे. या हंगामात दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आवश्यक उस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.”
यावर्षी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्यात युध्दपातळीवर कामे सुरु आहेत. सर्व विभागाची कामे चालू करण्याच्या प्रक्रियेस गती देण्यात आली आहे. नजीकच्या काही दिवसात या हंगामाचा शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. ऊस उत्पादकांना योग्य हमीभाव देण्याची सोनाई कृषी प्रक्रिया कारखान्याची परंपरा यापुढे ही अखंडितपणे सुरु रहाणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी अभिमान करे, योगेश देवकर, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. भुंजकर, मुख्य अभियंता सुभाष काळे, उमेश ननवरे, रामहरी माने, इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी होते