शेती महामंडळाच्या कामगारांना न्याय मिळवून द्यावा, कामगारांच्या वसाहतीची दुरावस्था

इंदापूर : शेती महामंडळाच्या कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शेती महामंडळ बंद पडून दहा ते बारा वर्षे उलटून गेली आहेत. शासन शेती महामंडळाचे कामगार वा त्यांच्या वारसांना कोणत्या ही प्रकारची मदत करत नाही. त्यामुळे कामगारांच्या रोजगाराचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून भिजत पडला आहे. मागील वर्षाच्या पावसाळ्यात या कामगारांच्या नऊदारे येथील डबघाईला आलेल्या वसाहतीची दुरावस्था झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात वसाहत टिकेल की नाही याची शाश्वती नाही, असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात काटे यांनी म्हटले आहे.
आपण जातीने लक्ष घालून प्रशासकीय अधिका-यांकरवी कामगारांच्या व्यथा जाणूून घ्याव्यात वसाहतीची पहाणी करावी व कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा काटे यांनी व्यक्त केली आहे.