राज्य गुणवंत कामगार असोसिएशन अध्यक्षपदी केसरकर, तर सचिव पदी पिंपरी-चिंचवडचे स्वानंद राजपाठक


महाबुलेटीन नेटवर्क / वैभव हन्नुरकर
पिंपरी-चिंचवड : महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे सुरेश केसरकर यांची निवड करण्यात आली असून सचिवपदी चिंचवडचे गुणवंत कामगार स्वानंद राजपाठक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळच्या ( महाराष्ट्र राज्य अंगीकृत संस्था ) वतीने दरवर्षी राज्यातील कामगारांचा गुणवंत कामगार पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. या गुणवंत कामगारांना एकत्रित करुन कामगारांचे प्रश्न हाताळण्यासाठी राज्यस्तरीय गुणवंत कामगार असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेची आज ऑनलाईन बैठक संपन्न होवून असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेश केसरकर तर सचिवपदी स्वानंद राजपाठक यांची नियुक्ती एकमताने करण्यात आली आहे.
असोसिएशनची कार्यकारणीही यावेळी निवडण्यात आली असून यात उपाध्यक्षपदी नरेंद्र रहाटे (चंद्रपूर), अच्युतराव माने (उस्मानाबाद), तात्यासाहेब भोसले (सोलापूर), दिलीप घोलप (मुंबई उपशहर) यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिव पदी मुकुंद कोकणे (औरंगाबाद), खजिनदार पदी सुहास वड्डीकर (सांगली), सहखजिनदार पदी देवराव कोंडेकर (गडचिरोली) यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणुन अनिल मावळे (अकोला), अरुणकुमार आठवले (अमरावती), सोपान बांगर (अहमदनगर), महादेव चक्के (कोल्हापूर), नितीन गादेवार (गोंदिया), शैलेंद्रनाथ इंगळे (जळगाव), रामेश्वर वरखडे (जालना), केरबा डावरे (ठाणे), भगवान पाटील (धुळे), गुलाबराव सोनवणे (नंदुरबार), अरविंद देशमुख (नागपूर), रत्नाकर शिंदे (नांदेड), मारुती जाधव (नाशिक), किसन शिरलेकर (परभणी), धनंजय पाटील (पालघर), सुधीर मुंडे (बीड), सुरेश साबळे (बुलढाणा), प्रमोद नागदेवे (भंडारा), प्रभाकर कांबळे (मुंबई), अरविंद जनबदकर (यवतमाळ), संजय सुर्वे (रत्नागिरी), शरद पाटील (रायगड), काशीनाथ जनगावे (लातूर), चंद्रसेन डोंगरे (वर्धा), निलेश सोमाणी (वाशिम), शिवाजी इंगवले (सातारा), दिलीप साटम (सिंधुदुर्ग), शेख सलीमोद्दीन (हिंगोली) आदींची निवड करण्यात आली आहे.
या संदर्भात माहिती देताना सचिव स्वानंद राजपाठक यांनी सांगितले की, जे कामगार सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला-क्रिडा, संघटना व आस्थापना आदीबाबींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतो, अशा कामगारांना कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दरवर्षी किमान ५१ गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन गौरविले जाते. हे सर्व गुणवंत कामगार समाजासाठी भुषणावह असतात. राज्यावर, देशावर ज्यावेळी अस्मानी संकट व नैसर्गीक आपत्ती ओढवते, त्यावेळी शासनाला सर्वोत्तोपरी सहकार्य करणेसाठी, राज्यातील सर्व गुणवंत कामगारांचा सक्रिय सहभाग असतो. अशा राज्यातील गुणवंत कामगार बंधू-भगिणींनी, सर्व क्षेत्रातील कामगार व समाजातील सर्व घटकांसाठी, भविष्यात राजकारण विरहित, विधायक कार्य करण्याच्या हेतूने एकत्र येऊन व त्यांच्या मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन (कार्यक्षेत्र-महाराष्ट्र राज्य) या संघटनेची स्थापना करण्यात केली आहे.
भविष्यात असोसिएशनच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम हाती घेतले जाणार असून त्यांचा राज्यातील कामगारांना तसेच शासनालाही उपयोग होईल असेही स्वानंद राजपाठक यांनी सांगितले.