ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती आता कोर्टाच्या दारात
प्रशासक नियुक्तीच्या सर्व याचिकांची सोमवारपासून एकत्रित सुनावणी
महाबुलेटिन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीच्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी झाली. त्यामुळे सर्व सुनावण्यांचा पुढील निर्णय होईपर्यंत शासनाने प्रशासक नियुक्तीच्या निर्णयाला काही दिवस खो बसला आहे. न्यायालयीन निर्णय झाल्यानंतरच प्रशासक नियुक्ती होणार आहे. मुंबई व औरंगाबाद खंडपीठापुढे एकूण ८ याचिकांवर सोमवारी ( दि. २७ ) एकत्रित सुनावणी होणार आहे. असा आदेश आज हायकोर्टाने आज विलास कुंजीर व अशोक सातव यांच्या याचिकेच्या सुनावणीवेळी दिला आहे. सुनावणी झाल्यानंतर जो निर्णय होईल, तो शासनाला पुढील काळात घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला बंधनकारक राहणार असल्याचे याचिकाकर्ते व पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांचे वकील ऍड. चेतन नागरे व व ऍड. कंकाळ यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील मुदत संपलेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीसाठी सुनावणीचा निर्णय होईपर्यंत गाव कारभाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.