खेडगुन्हेगारीविशेष

पूर्व वैमनस्यातून चाकणला युवकाचा कोयत्याने खून

तीन जणांवर गुन्हा दाखल, आरोपी फरार
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : खंडणी मागितली म्हणून तक्रार केल्याने पोलिसांनी अटक केल्याचा राग मनात धरून तिघांनी मिळून तक्रार देणाऱ्या व्यक्तीचा कोयत्याने वार करत निर्घृणपणे खून केल्याची घटना रविवारी ( दि.२६ ) रात्री सव्वासात वाजता मेदनकरवाडी ( ता. खेड ) येथे घडली.
राजेंद्र जालिंदर काळे ( वय ३६, रा. मेदनकरवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी सत्यम दत्तात्रय कड ( रा. कडाचीवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे ) आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी राजेंद्र यांची पत्नी सोनाली राजेंद्र काळे ( वय ३१, रा. मेदनकरवाडी, चाकण, जि. पुणे. मूळ रा. सारोळा, ता. जामखेड, जि.  अहमदनगर ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०१८ मध्ये मयत राजेंद्र काळे याने आरोपींच्या विरोधात खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. त्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर आरोपींनी राजेंद्र यांच्या खुनाचा कट रचला.
रविवारी रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास राजेंद्र काळे हे मेदनकरवाडी येथे सिद्धिविनायक नगर नंबर दोनमधील भाले यांच्या गाळ्याजवळ आले असता आरोपींनी त्यांच्या डोक्यात, पाठीवर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र यांचा यातच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून गुन्हे शाखेचे पोलीस पथक आरोपींचा शोध घेत आहेत.
रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल दांडगे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!