मी, मी म्हणतायत आजी- माजी खासदार!
महाबुलेटिन नेटवर्क | शिवाजी आतकरी
राजगुरूनगर : अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बायपास रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी निविदा नुकतीच उघडण्यात आली आहे. तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर बायपासचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजगुरुनगर व मंचर बायपास रस्त्यांची लांबलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ४.९८१ कि.मी. लांबी असलेला राजगुरुनगर आणि ७.४७६ कि.मी. लांबीचा मंचर बायपास त्याचबरोबर पेठ गाव ०.६८० कि.मी व एकलहरे ते रविकिरण हॉटेल १ कि.मी. या कामांना तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर सुरुवात होईल. मूळ रु. २१६.५८ कोटींची निविदा असलेले हे सुमारे २२ टक्के कमी (रु. १६९.८३ कोटी) निविदा भरलेल्या टी अॅण्ड टी इन्फ्रा, पुणे या कंपनीला मिळाले आहे.
पुणे नाशिक महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडून आल्यावर या रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नारायणगाव आणि खेडघाट येथील बायपास रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढला. त्यामुळे या दोन्ही बायपास रस्त्यांची कामे सुरू झाली. येत्या काही काळात हे दोन्ही बायपास रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार आहेत.राजगुरुनगर व मंचर बायपास रस्त्यांची कामे मार्गी लागत असतानाच कळंब आणि आळेफाटा बायपास रस्त्यांची निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली असून ३० जुलै २०२० ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणतात….
“चांडोली ते आळेफाटा या दरम्यानची सर्वच बायपास रस्त्यांची मार्गी लावून येथील जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सध्याची कोरोना पार्श्वभूमीवर मोशी – चांडोली दरम्यान सहापदरी रस्त्यासाठी भूसंपादनात अडचणी आहेत. लवकरच नाशिक फाटा ते मोशी आणि मोशी ते चांडोली या दोन्ही टप्प्यातील भूसंपादनातील अडचणी दूर करून हे काम मार्गी लागेल”.
काय घडतंय….
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडूनही या रस्त्याबाबत पाठपुराव्याचा दावा केला जातोय. खासदार डॉ अमोल कोल्हे हेही पत्रकारांना याबाबत बारकाईने माहिती देत असून पाठपुरावा कोणत्या स्थरावर आहे ते सांगत आहेत. आजी- माजी खासदारांकडून याबाबत माहिती दिली जात असल्याची वस्तुस्थिती आहे.