पोलीस पाटलासह १४ जणांवर गुन्हा दाखल, आपत्ती व्यवस्थापन कायद्याला केराची टोपली
सभा व पदयात्रा घेणे भोवले, गावचे रक्षकच झाले भक्षक!
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले असताना आणि गावाच्या आरोग्याची जबाबदारी गावातील महत्वाचे व्यक्ती पोलीस पाटील यांच्यावर दिली असताना, खेड तालुक्यातील काळूस येथील नवनियुक्त पोलीस पाटील रुपेश आरगडे यांनी चक्क गावात जमाव जमवून सभा आणि पदयात्रा घेतल्याने त्यांच्यासह गावातील इतर १३ व्यक्तीवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात भारतीय संहिता कलम १८८, २६९ आणि राज्यात लागू असलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा ५१ (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावाचे रक्षकच जर भक्षक झाले तर सर्व सामान्य जनतेला जीव मुठीत घेऊन आपला जीव या कोरोना महामारीतून वाचवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याविषयी पोलीस पाटील यांनी कोणत्याही प्रकारची काळूस ग्रामपंचायतची परवानगी घेतली नव्हती, असे सरपंच यांनी स्पष्ट केले आहे.
वरील सर्वांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर काळूस गावचे माजी पोलीस पाटील संदीप पवळे यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावरून रुपेश आरगडे हे नवनियुक्त पोलीस पाटील आहेत, त्यांना शासनाने घालून दिलेले नियम माहीत नाहीत का? किंवा त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात १४ व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्याने काळूस मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.