मी पुन्हा येईन…. मी पुन्हा आलो!
महाबुलेटिन नेटवर्क/शिवाजी आतकरी
मंचर : कोविड 19 आणि त्या अनुषंगाने अफवा, भय, उपचार यांविषयी सातत्याने चर्चा होताना दिसते. कोरोनाग्रस्तांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलताना दिसतो. इतकेच काय एखाद्याच्या तब्येतीविषयी जे चर्वितचर्वण अलीकडे होताना दिसते, ते निश्चितच चुकीचे आहे.
मी पुन्हा येईन, मी नक्की बरा होईन, असा विश्वास देऊन मंचर गावचे माजी सरपंच मोहन डावखरे ॲम्बुलन्स मध्ये बसले. कोरोनावर मात करून ते पुन्हा घरी परतले आहेत.. एक महिन्यापेक्षा जास्त काळ ते कोरोना लढाई लढत होते. या लढाईत त्यांनी यशस्वीपणे कोरोनाला मात दिली. त्यांच्या या लढाईदरम्यान त्यांच्या पश्चात अफवा, चर्चा वगैरे जे काही घडले, ते बिनबुडाचे होते. निराधार होते. त्या चर्चेला अर्थ नव्हता. ते माणुसकी विरोधात होते. डावखरे यांच्या तब्येतीविषयी माहिती नसताना बरेच काही बोलले गेले, ते दुर्दैवी होते.
खरे तर या निमित्ताने अनेक प्रश्न उभे राहतात. खरच ते बरे व्हावे म्हणून कितीजणांनी प्रार्थना केली, अनेकांनी तर त्यांना अनेक वेळा मयत म्हणून घोषित केल्याचे कानावर आले. काही अतिउत्साही मंडळींनी तर त्यांचा अंत्यविधी उरकून टाकल्याचेही कानावर आले. हा प्रसंग माजी सरपंचावर आला. उद्या आपल्यावर पण येऊ शकतो, याचे भान मात्र अनेकांना राहिले नाही.
मंचर शहरात ४७ रुग्णसंख्या आहे. अजूनही अनेक जण आपल्याला काहीच होणार नाही या अति आत्मविश्वासात विना मास्क आणि शासकीय नियमाचे पालन न करता वावरत आहेत. आपल्याला काही होणार नाही हा आत्मविश्वास बाळगा, पण तो शासकीय नियम व आरोग्यविषयक काळजी घेऊन!
आत्मविश्वासाने माजी सरपंच मोहन डावखरे यांनी कोरोना लढाई जिंकली. मात्र कोणत्याही पेशंटच्या मागे त्याच्याबद्दल किंवा त्यांच्या नातेवाईकाबद्दल वाईट बोलू नका. कारण आपल्या सहज बोलण्याचा त्या कुटुंबावर काय परिणाम होत असेल याचा विचार करा.. ह्या गोष्टी काळजाला खटकतात. कोरोना या आजारावर अजून तरी जगात औषध सापडले नाही,असे म्हणतात. पण या कठीण काळात एकमेकाला आधार द्या हेच औषध या रोगावर गुणकारी होऊ शकते. आपल्याला माणसात अंतर ठेवायला सांगितला आहे.. माणुसकीत नाही, हे माजी सरपंच डावखरे यांच्या उदाहरणावरून लक्षात घ्यायला हवे….