खवय्यांसाठी आनंदाची बातमी : हॉटेल, लॉज व गेस्ट हाऊस सुरु करण्यास सरकारची काही अटींवर परवानगी
महाबुलेटिन नेटवर्क : विशेष प्रतिनिधी
पुणे : दि. ७ जुलै पासून कंटेनमेंट झोन वगळून महाराष्ट्रात हॉटेल्स, गेस्ट हाऊस व लॉज काही अटींवर सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसा आदेश मुख्य सचिवांनी काढला आहे. या आदेशात उपलब्ध क्षमतेपैकी ३३ टक्के वापर करण्याचे सरकारने म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील हॉटेल्स असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला असता हा निर्णय घेण्यात आला.
कोणत्या अटी लागू केल्या आहेत ?
थर्मल स्कॅन वापरणे, ग्राहकांमध्ये योग्य अंतर ठेवून सोशल डिस्टन्सचे पालन करणे, रोख रकमेचा वापर कमी करणे, सॅनिटायझरची सोय करणे, कर्मचाऱ्यांनी योग्य दक्षता घेणे, ग्राहकांनी रूम सर्व्हिसचा किमान वापर करणे, लिफ्टमध्ये सोशल डिस्टन्स पाळून कमीत कमी व्यक्तींना परवानगी देणे आदी अटी लावण्यात आल्या आहेत.
सरकारने आमच्याकडे कोरोनायोद्धा म्हणून पाहावे, कारण सगळीकडे लोक बेरोजगार होताना, त्यांच्या नोकऱ्या जात असतानाही आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना दूर लोटले नाही. त्यांचा संसार चालेल याची आम्ही काळजी घेतली आहे. आम्ही सरकार सोबत असून आजही आमच्याकडे ८० टक्के स्थलांतरित कामगार आहेत. इंडियन हॉटेल्स असोशिएशनचे गुरुबक्ष सिंग कोहली यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी करताच सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आदी उपस्थित होते.
“लॉकडाऊन मुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाचे दरमहा अंदाजे १०० कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. मुख्यमंत्र्यांनी हॉटेल व्यावसायिकांच्यऻ समस्येवर तातडीने निर्णय घ्यावा, नाहितर कोरोनामुळे नाही परंतु उपासमारीने मरण्याची वेळ राज्यातील लाखो हॉटेल व्यावसायीक व कामगारांवर व या व्यवसायावर अवलंबून असलेल्या घटकांवर येइल. त्यामुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय पूर्ववत चालू करावेत” अशी मागणीआम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली होती – बाळासाहेब दाते ( जिल्हा अध्यक्ष – पुणे जिल्हा ग्रामीण हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन )