कर्मयोगी कारखाना १४ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार : हर्षवर्धन पाटील.
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : यंदाच्या गळीत हंगामात कर्मयोगी कारखाना चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करणार आहे, अशी माहिती कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
कर्मयोगी सहकारीच्या मिल रोलरचे पूजन आज (दि.३०जुलै) त्यांच्या व कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या हस्ते, संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न झाले. त्यावेळी पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, कर्मयोगी सहकारीने यंदाच्या गळीत हंगामाची जोरदार तयारी केली आहे. गळीत हंगाम वेळेत सुरु व्हावा, यासाठी गाळप क्षमतेनुसार ऊसतोडणी वाहतुकीसाठी ट्रक व ट्रॅक्टरचे साडेपाचशे करार पूर्ण झाले आहेत. बैलगाडीचे सातशे ७०० व ट्रॅक्टरचे चारशे करार करण्याचे काम सुरु आहे.
ऊस वाहतुक कंत्राटदारांना कारखान्याच्या धोरणानुसार ॲडवान्स वाटपाचे काम सुरू आहे. तोडणी मुकादमांचा त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. आवश्यक असलेले करार कारखान्याने पूर्ण केले आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.
कर्मयोगी कारखान्याने या गाळप हंगामामध्ये कार्यक्षेत्रामधील सभासदांच्या उपलब्ध ऊस क्षेत्राची व शेतकी विभागाकडे नोंद झालेल्या ऊसक्षेत्राची माहिती घेऊन यंदा चौदा १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे, असे पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाळप हंगामासाठी कारखाना कार्यस्थळावर आलेल्या संपूर्ण यंत्रणेशी संबंधितांच्या आरोग्याची काळजी कारखान्याच्या घेतली जाणार आहे, अशी माहिती कर्मयोगीचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी दिली.
यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, यशवंत वाघ, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र चोरमले, भास्कर गुरगुडे, सुभाष काळे, प्रशांत सुर्यवंशी, मानसिंग जगताप, मच्छिंद्र अभंग, विष्णू मोरे, अंबादास शिंगाडे, केशव दुर्गे, अतुल व्यवहारे, वसंत मोहोळकर, सुभाष भोसले, पांडुरंग गलांडे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, कार्यालयीन अधीक्षक शरद काळे, वर्क्स मॅनेजर ए.सी. पोरे, चीफ केमिस्ट यु.के.कांदे, मुख्य शेतकी अधिकारी एस. जी. कदम व सर्व अधिकारी उपस्थित होते.