इंदापूरची कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे : काँग्रेस तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत
महाबुलेटीन नेटवर्क /प्रतिनिधी
इंदापूर : शहरात झपाट्याने वाढणारी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन व नगरपरिषदेने युध्दपातळीवर योग्य उपाययोजना कराव्यात, असे मत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, कोरोनाच्या साथीच्या प्रारंभीच्या काळात प्रशासन व नगरपरिषदेने कोरोना नियंत्रणासाठी ज्या चोख उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे इतर भागात कोरोना थैमान घालत असल्याच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण त्यावेळी आढळले नव्हते. नंतरच्या काळात आढळले, तथापि त्याचे प्रमाण नगण्य होते.
जिल्हाबंदी शिथिल केल्यानंतर मात्र रुग्णांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे, असे सांगून ते म्हणाले की, मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे याचा लोकांना विसर पडू लागला आहे. चौकाचौकात चहाच्या गाड्यावर, मंडईमध्ये लोक गर्दी करत असताना दिसत आहे. शासनाच्या सूचनेची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. ही धोक्याची घंटा असून प्रशासनाने तातडीने हालचाली करुन युध्दपातळीवर उपाययोजना केली पाहिजे, अशी अपेक्षा सावंत यांनी व्यक्त केली.