वार्डनिहाय आपत्तीव्यवस्थापन समिती स्थापन करावी : काँग्रेस शहराध्यक्ष तानाजी भोंग
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
इंदापूर : स्थानिक नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकांना घेऊन वार्डनिहाय आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करावी या व इतर मागण्यांचे निवेदन काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तानाजी भोंग व त्यांच्या सहका-यांनी आज ( दि.२७ जुलै ) इंदापूर नगरपरिषदेकडे दिले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर करावा व गर्दी टाळावी यासाठी नगरपरिषदेने लोकांवर सक्ती करावी. शहरातून बाहेरगावी ये-जा करणा-या लोकांची, प्रवाश्यांची नोंद ठेवण्यात यावी. वार्डनिहाय आरोग्य तपासणी करावी. शहरातील गर्दीच्या ठिकाणी आवश्यक सुचना व उपाययोजना कराव्यात. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यात यावे. भाजी मंडईत विक्रेत्यांना अंतर सोडुन बसण्यासाठी मार्गदर्शक सूचना अंमलबजावणी करण्यात यावी. शहरात वार्डनिहाय सॅनीटायझर फवारावे. गोरगरीबांना अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अश्या मागण्या या निवेदनात भोंग यांनी केल्या आहेत.
वरील उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. अन्यथा, होणाऱ्या दुष्परिणामास नगरपरिषद जबाबदार राहिल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, तहसिलदार सोनाली मेटकरी यांच्याकडे निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.
जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस जकिर काझी, तालुका उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे, शहर कार्याध्यक्ष चमनभाई बागवान, उपाध्यक्ष तुषार चिंचकर, भगवान पासगे, सुरेश लोखंडे, सुफियान जमादार यावेळी उपस्थित होते.