Thursday, May 15, 2025
Latest:
भोरराजकीयविशेष

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : आमदार संग्राम थोपटे

महाबुलेटिन नेटवर्क / संतोष म्हस्के
भोर : भाटघर, वीर धरणातील ६१ गावांच्या पुनर्वसनाचे अनेक प्रलंबित प्रश्न तसेच रखडलेल्या विकास कामांना शासनाने पहिल्या टप्प्यात ३० कोटीचा निधी मंजूर केला आहे. १८ नागरी सुविधांतर्गत विकास कामांना प्राधान्यक्रम ठरवून दोन टप्प्यात पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी शुक्रवार ( दि. १७ ) रोजी रायरेश्वर डोंगरी विकास कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्याचे पुनर्वसन मंञी विजय वडेट्टीवार आणि आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन समितीचे मुख्य सचिव किशोर निबांळकर यांच्यासोबत आमदार संग्राम थोपटे यांनी मुंबई येथे बैठक घेतली. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष शैलेश सोनवणे, जि.प. सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, भाटघर प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल वरखडे, सचिव काळुराम मळेकर, वीर प्रकल्पग्रस्त अध्यक्ष शंकर धाडवे, सचिव महेश टापरे तसेच मंञालयामधून व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते. भाटघर आणि वीर प्रकल्पग्रस्त समिती यांना बरोबर घेऊन ६१ गावातील १८ नागरी सुविधांतर्गत येणारा विकास निधी तसेच वीर धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या, धरणग्रस्तांना दाखले, कोंढरी ता. भोर, घुटके ता. मुळशी या गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन अशा विविध मागण्या आमदार संग्राम थोपटे यांनी केल्या. त्याप्रमाणे सचिव किशोर निंबाळकर यांनी तातडीने संबंधित आयुक्तांकडून सदर गावांच्या घटनेचा अहवाल मागवला असून त्वरीत प्रस्ताव करन्याच्या सूचना दिल्या. यावेळी कोंढरी व घुटके या दोन्ही गावांचे तातडीने कायमचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन पुनर्वसन मंञी विजय वडेट्टीवार यांनी आमदार संग्राम थोपटे यांना दिले. भाटघर, वीर या धरणभागातील ६१ गावांत धरणग्रस्तांचे दाखले देण्यासाठी पुनर्वसन अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या बरोबर गावपातळीवर बैठका घेऊन धरण ग्रस्तांना दाखले द्यावेत, अशा सुचना यावेळी दिल्या. शासनाच्या १८ नागरी सुविधेंतर्गंत गावातील ग्रामपंचायत कार्यालय, काँक्रींट रस्ता, गटारे, समाज मंदीर, शिवकालीन टाक्या, नळपाणीपुरवठा योजना, खराब झालेले विद्युत पोल, विद्युत जोड यंञी अशा अनेक विकास कामांचे अंदाजपत्रक तातडीने सादर करावे, त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवून दोन टप्प्यात विकास कामे केली जातील असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!