शून्यातून विश्व निर्माण करणारे गोकुळदास शहा भावी पिढ्यांचे प्रेरणास्थान…
‘भाई आणि आम्ही’ या पुस्तकातून नव्या पिढीला आदर्श जीवनशैली जगण्याची प्रेरणा
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : ‘विचार व तत्वांशी फारकत न घेता अविरत कष्टातून स्वतःला सिध्द करणारे व शून्यातून विश्व निर्माण करणारे गोकुळदास शहा हे व्यक्तिमत्व भावी पिढ्यांचे प्रेरणास्थान आहे, असे गौरवोद्रगार अकलूज येथील प्रख्यात वैद्यकीय व्यवसायिक डॉ. एम. के. इनामदार यांनी काढले.
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व माजी उपाध्यक्ष, ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते गोकुळदास शहा तथा भाई यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘भाई आणि आम्ही’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. इनामदार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. शहा यांच्या निवासस्थानी अनौपचारिक वातावरणात, निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात हा पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
डॉ. इनामदार म्हणाले की, निकोप सामाजिक दृष्टिकोन ठेवून, जीवन जगताना भाईंनी सचोटीने व्यवसाय, समाजकार्य केले. कायमस्वरुपी एकत्र कुटुंबपध्दत जोपासली अन तेच संस्कार त्यांनी येणा-या पिढ्यांवर केले आहेत. उर्जा देणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख कायम रहाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. ‘भाई आणि आम्ही’ या पुस्तकातून नव्या पिढीला आदर्श जीवनशैली जगण्याची प्रेरणा निश्चितपणे मिळणार आहे, असे ते म्हणाले.
‘भाई आणि आम्ही’ चे शब्दांकन करणारे मुकुंद शहा म्हणाले की, “स्वातंत्र्यसेनानी नारायणदास रामदास शहा यांच्या संस्कारातून भाईंच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. त्यांच्यासारख्या ध्येयवादी माणसांची पुस्तके आली पाहिजेत. ती ध्येयवादाने काम करणाऱ्यांसाठी आदर्शवत ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. विद्युत शहा म्हणाले की, भाईंचे व्यक्तिमत्व हे महासागरासारखे विशाल आहे. हाती घेतलेले काम ध्यास बाळगून सचोटीने करा यश नक्कीच मिळेल अशी त्यांची विचारसरणी आहे.”
यावेळी डॉ. संजय शहा, शकुंतला शहा, मालती शहा, वैशाली शहा, शैलेश शहा, सौरभ शहा, भरत गांधी, यश गांधी, जिगर दोशी, रिया दोशी, निनाद शहा, अंगद शहा, पुर्वा शहा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुकुंद शहा, भरत शहा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी आभार मानले.
●● स्वातंत्र्यसेनानी दिवंगत नारायणदास रामदास शहा यांचा वैचारिक वारसा समर्थपणे पुढे नेणारे गोकुळदास शहा तथा भाई यांचे इंदापूरच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. माजी खासदार दिवंगत शंकरराव पाटील यांचे राष्ट्र सेवा दलापासूनचे निकटचे सहकारी असणा-या भाईंनी अनेक संस्थांची उभारणी करताना अपार कष्ट घेतले आहेत. अत्यंत पारदर्शक कार्यपध्दत असणा-या भाईंकडे इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, इंदापूर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद अशी जबाबदारीची अनेक पदे आली. त्यांनी स्वच्छ कामाचा ठसा तेथे उमटवला आहे. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांच्याबाबत आदरयुक्त दबदबा कायम आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी सांगितलेल्या आठवणी त्यांचे सुपूत्र, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी शब्दबध्द केल्या, त्यातून ‘भाई आणि आम्ही’ चा जन्म झाला. भाईंनी सांगितलेल्या आठवणींपैकी चांगल्या आठवणी पुस्तकामध्ये समाविष्ट करून क्लेषकारक आठवणी वगळलेल्या आहेत.