इंदापूरकोरोनापुणे जिल्हामहाराष्ट्रविशेष

महाबुलेटीन ब्रेकिंग न्यूज : त्या सतरा कैद्यांसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव

 

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे १७ कैद्यांना कोरोनाची लागण

महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : येथील दुय्यम कारागृहामधील कोरोनाग्रस्त झालेल्या सतरा कैद्यांना तेथेच एका बराकीत विलगीकरण कक्ष करुन एकत्र ठेवण्यात आल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे यांनी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे.

सर्व कैद्यांना सामान्य नागरिकांप्रमाणेच मानवी हक्काचे संरक्षण करून तात्काळ विलगीकरण करून औषधोपचार देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे पाठवलेल्या तक्रारीत झेंडे यांनी म्हटले आहे की, दि.२४ ऑगस्ट रोजी येथील दुय्यम कारागृहात असणा-या एका कैद्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत प्रशासन व आरोग्य विभागाने योग्य काळजी घेतली नाही. परिणामी पुढील दोन तीन दिवसात त्या कैद्याच्या बराकीमधील इतर १७ कैदी व दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. हा प्रशासनाचा खूप मोठा हलगर्जीपणा आहे.

या १७ कैद्यांचे कारागृहातील बराकीमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक अंतराच्या नियमाचा पूर्ण फज्जा उडाला आहे,असे झेंडे यांनी तक्रारी अर्जात नमूद केले आहे. मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ अन्वये कैद्याला देखील इतर लोकांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. त्याला वेळेवर औषध उपचार मिळणे गरजेचे आहे. कारागृहाच्या बराकीत विलगीकरण  केल्यामुळे त्यांच्या आरोग्य सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे,असे अर्जात म्हटले आहे.

पत्रकारांशी बोलताना झेंडे म्हणाले की, याबाबत आपण
तात्काळ कारवाईसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावून खुलासा मागवण्याबाबत विनंती केली आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या सर्व कैद्यांना सामान्य नागरिकांप्रमाणेच मानवी हक्काचे संरक्षण करून तात्काळ विलगीकरण करून औषधोपचार देण्यात यावे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनावर आहे याची नोंद घेतली जावी.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!