लॉकडाऊन काळातील विजबिले माफ करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा चाकण शहर भाजपचा इशारा…
महाबुलेटीन नेटवर्क / प्रतिनिधी
चाकण : कोरोना विषाणू प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊन दरम्यान सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडून वापर झालेल्या विजेची बिले माफ करावीत अथवा मोठ्या प्रमाणात सवलत मिळावी, यासाठी आज ( दि. ९ जुलै ) चाकण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन मागणी केली, अन्यथा येत्या काळात महावितरण व राज्य शासनाचे विरुद्ध अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चाकण शहर भाजपने दिला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभरात पसरलेल्या या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन करावा लागला. आपल्या देशात देखील आणि पर्यायाने महाराष्ट्र राज्यात देखील लॉक डाऊन करावा लागला. दरम्यानच्या काळात सर्व नागरिकांना जगण्यासाठी धडपड करावी लागली आणि प्रचंड आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागले. सदर काळात कुठल्याही नोकरदारांना हाताला काम ना पगार अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच हवालदिल झाले आहेत. त्यातच महावितरणकडून भरमसाठ विजेची बिले ग्राहकांना देण्यात आली. बँक आर्थिक कोंडीत सापडला असताना महावितरणने विजेची बिले देऊन आणखी अडचण मध्ये भर पडली असून लॉकडाऊन दरम्यान सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडून वापर झालेल्या विजेची बिले माफ करावी अथवा मोठ्या प्रमाणात सवलत द्यावी अन्यथा येत्या काही काळात महावितरण व राज्य शासनाचे विरुद्ध अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असे भारतीय जनता पार्टी चाकण शहर अध्यक्ष अजय जगनाडे यांनी सांगितले. यावेळी ऍड. प्रीतम शिंदे, बाळासाहेब नाणेकर, संदेश जाधव, सुनील शेवकरी, प्रतीक गंभीर, गणेश उंबरे, मोतीराम बाबीस्कर, जीतेंद्र सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.