खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात शिवशंभू छावा प्रतिष्ठानचा शेतकऱ्यांना पाठिंबा.. ● मुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांना प्रतिष्ठानने पाठविले निवेदन
खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात शिवशंभू छावा प्रतिष्ठानचा शेतकऱ्यांना पाठिंबा..
● मुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांना प्रतिष्ठानने पाठविले निवेदन
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : खेड सेझ पंधरा टक्के परतावा प्रश्नासंदर्भात शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे.
शिवशंभु छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेस सेझ बाधित शेतकऱ्यांचे दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांना पाठविलेले निवेदन मिळाले. त्यानुसार प्रतिष्ठानच्यावतीने सेझ बाधीत शेतकऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नासंदर्भात शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी संघटनेने पाठिंबा जाहीर केला.
संघटनेच्या वतीने सेझ बाधित शेतकऱ्यांचा १५ टक्के परतावा हा प्रश्न त्वरित सोडविण्यास संदर्भात कार्यवाही व्हावी. या संदर्भातील निवेदन १२ मे २०२१ रोजी माननीय मुख्यमंत्री, उद्योग मंत्री यांना देण्यात आले आहे. निवेदन देऊनही प्रश्न सुटला नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
सेझ बाधित शेतकऱ्यांचा पंधरा टक्के परताव्याचा प्रश्न गेली १२ वर्ष प्रलंबित असून त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने करून व निवेदन देऊनही त्यांना न्याय मिळाला नाही. ४५० भागधारकाचे अंदाजे पंचावन्न कोटी रूपये एवढी आगाऊ रक्कम जमीन संपादनाच्या वेळेस कपात करण्यात आली असून अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना पंधरा टक्के परतावा मिळाला नाही.
याबाबत सेझबाधित शेतकऱ्यांची अशी भूमिका आहे की, शासनाच्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या मार्फत शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले आहे, त्यामुळे हा प्रश्न शासकीय पातळीवर सोडविला जावा. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग मंत्री, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केईआयपीएल प्रतिनिधी, सेझ बाधित शेतकरी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा.
सेझ बाधित शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला शिवशंभो छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचा पाठिंबा असून शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी यापुढे संघटना तीव्र आंदोलन सेझ बाधित शेतकऱ्यांना समवेत घेऊन करणार आहे. हा प्रश्न पूर्ण सुटे पर्यंत संघटना सेझबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम . उभी राहणार असून त्यांना त्यांचा न्याय मिळवून देणार आहे. असे संघटनेचे अध्यक्ष भरतशेठ पवळे, सचिव मनोहर गोरगल्ले यांनी जाहीर केले.
शिवशंभु छावाप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी बाधित शेतकऱ्यांच्या वतीने प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, काशिनाथ हजारे, पंढरीनाथ दौंडकर, एकनाथ गोरडे, विश्वास कदम, ॲड. सुनील लिमगुडे यांनी विशेष प्रयत्न केले.