कर्मयोगी कारखान्याच्या ऊस तोडणी वाहतुक करारास उत्स्फुर्त प्रतिसाद
महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे
इंदापूर : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२० -२१ ची तयारी जोरदारपणे सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर बैलगाडी व ट्रॅक्टरगाडीच्या कराराच्या आज ( दि.९ जुलै ) झालेल्या शुभारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या संदर्भात माहिती देताना कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष पद्मा भोसले यांनी सांगितले की, ऊसतोडणी वाहतुकीच्या ट्रक, ट्रॅक्टरचे गाळप क्षमतेप्रमाणे आवश्यक असणारे करार पूर्ण झाले आहेत. बैलगाडी व ट्रॅक्टर गाडीच्या कराराचा शुभारंभ आज सकाळी कारखानास्थळी करण्यात आला.
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने येणा-या गाळप हंगामामध्ये कार्यक्षेत्रातील सभासदांच्या उपलब्ध ऊस क्षेत्राची व शेतकी विभागाकडे नोंद झालेल्या ऊस क्षेत्राची माहिती घेऊन चौदा लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे, असे सांगून ते म्हणाले की, ऊसतोडणी व वाहतुक यंत्रणा उभारणीचे काम सुरु आहे. त्यानुसार ट्रक व टॅक्टरचे कार्यक्षेत्रातील चारशे व कार्यक्षेत्राबाहेरील दीडशे करार पूर्ण झाले आहेत. बैलगाडी सातशे व टॅक्टरगाडी तीनशे करार करण्याचे काम सुरु आहे. त्यास तोडणी मुकादमांचा आज उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
कर्मयोगी कारखान्याच्या स्थापनेपासून आजतागायत काही ऊस तोडणी मुकादम कर्मयोगीकडेच काम करत आहेत. आज करार करण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहिल्याबद्दल सर्व प्रमुख बैलगाडी मुकादमांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात आला असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
पुढील येणा-या गाळप हंगामासाठी कारखाना कार्यस्थळावर उपस्थित झालेल्या यंत्रणेची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेण्याच्या दृष्टीने कारखान्याच्या वतीने संपुर्ण खबरदारी घेण्यात येईल, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी सांगितले.
कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, मुख्य शेतकी अधिकारी एस.जी.कदम, शेतकी अधिकारी के. एन. हिंगमिरे, वर्क्स मॅनेजर ए.सी. पोरे व सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते.