गाव शिवेच्या रस्त्याचा प्रश्न थेट पंतप्रधान कार्यालयात
आपल्या परिसरातील ताज्या बातम्या जलद वाचण्यासाठी आजच साईट वर बेल 🔔 दाबून सबस्क्राईब करा
भाटनिमगाव-बेडशिंगे गावच्या शिवेच्या रस्त्यात घातले पंतप्रधान कार्यालयाने लक्ष
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : तालुक्यातील भाटनिमगाव-बेडशिंगे गावच्या शिवेच्या रस्त्याचा प्रश्न थेट पंतप्रधानांच्या कार्यालयात पोहोचला आहे. तसे पत्र ‘त्या’ कार्यालयाकडून आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, भाटनिमगाव-बेडशिंगे या गावचा शिवेच्या तेहतीस फुट रुंदीच्या रस्त्यावर शेजारच्या शेतक-यांनी अतिक्रमण करत तो सात फुटावर आणून ठेवला आहे. अनेक वर्षांपासून ये-जा करण्याच्या दृष्टीने तो अडचणीचा ठरत आहे. पण त्या शिवाय ग्रामस्थांना पर्याय नाही. त्यामुळे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असा प्रकार होत आहे.
त्यातून मार्ग काढण्यासाठी परिसरातील शेतक-यांनी लोकवर्गणी करुन रस्ता दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. परंतू अतिक्रमण करणारांनींच त्या कामात खोडा घातला. या बाबत दि. १७ जुलै रोजी शेतक-यांनी तहसिल कार्यालय, इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तथापि काहीच कारवाई झाली नाही. त्या आधी दि. ९ जूलै २०१९ रोजी व वेळोवेळी रस्त्याबाबत निवेदने दिली, सरपंचांनी ही पत्र दिले. मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर शेवटी दि. ६ ऑगस्ट रोजी ग्रामस्थांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडेच तक्रार केली. त्या कार्यालयाचे तक्रार मिळाल्याचे पत्र ग्रामस्थांना मिळाले आहे. ‘आत्मनिर्भर बनण्याच्या’ पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला ग्रामस्थांनी असा प्रतिसाद दिला आहे.
आता तहसिल कार्यालय, पोलीस प्रशासन काम करते की ? पंतप्रधानांचे कार्यालय याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली आहे.