इंदापूरकोरोना

ग्रामीण भागातील कोरोनाच्या शिरकावाची कारणे शोधावीत : प्रवीण माने

महाबुलेटीन नेटवर्क / शैलेश काटे 
इंदापूर : संचारबंदीत शिथिलता आणल्यानंतर ग्रामीण भागात होवू लागलेल्या कोरोनाच्या शिरकावाची कारणे शोधली तरच त्याचा अटकाव करता येईल,असे मत जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी आज ( दि.८ ) बिजवडी ( ता.इंदापूर ) येथे बोलताना व्यक्त केले.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढीच्या व्हिटॅमिन सी व डीच्या गोळ्या वाटपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माने यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. बिजवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा कार्यक्रम झाला.
माने म्हणाले, “लॉकडाऊन  शिथिल झाल्यानंतर कामाच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या लोकांमधून हा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. परिस्थिती चिंतादायक होवू लागली आहे. मोठ्या शहरातून मूळ गावी परतलेल्या लोकांच्या विलगीकरणातील काही त्रुटींमुळे अथवा तालुक्यातील माणूस बाहेर कुणाच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे का, याचा शोध घेणे महत्वाचे आहे. तथापि लोकांनी घाबरुन जावू नये. योग्य ती काळजी घेवून कोरोनाला हद्दपार करण्याच्या शासनाच्या प्रयत्नास हातभार लावावा,” असे आवाहन त्यांनी केले.
या भागातील साठ वर्षे वयाच्या ग्रामस्थास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर बिजवडी-पळसदेव जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी गोळ्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत अकरा हजार गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती माने यांनी दिली. बिजवडी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी
चंदनशिवे, विस्तार अधिकारी जगताप, प्रतिभा गाडे, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!