चाकण शहरात नालेसफाईला वेग
महाबुलेटीन नेटवर्क / कल्पेश भोई
चाकण : पावसाळ्यापूर्वी हमखास पाणी तुंबून राहणाऱ्या रस्त्यालगतच्या परिसरात असलेल्या नाले सफाईच्या कामाला चाकण नगरपरिषदच्या वतीने वेगात सुरुवात करण्यात आली असून लवकरच शहरातून जाणारे मोठे ओढे आणि नाल्यांची स्वच्छता पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक पावसाळ्यात चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबेठाण चौक आणि तळेगाव चौक परिसरात असलेल्या उड्डाण पुलांच्या खाली हमखास पाणी साचून राहत असल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे उड्डाणपूलांच्या खालील भागात असलेले नाले प्रवाहित करण्याचे काम करण्यात आले. चाकण नगरपरिषदेच्या सर्व प्रभागातील मोठ्या नाल्यांसह लहान नाले व परिसरातील असलेला कचरा सदृश्य भाग हा साफसफाई मोहिम अंतर्गत घेण्यात येत असून चाकण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाने नाले साफ सफाईला प्रारंभ केला आहे. गरजेच्या ठिकाणी जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात येत आहे. आंबेठाण चौकाजवळील उड्डाण पुलाच्या खालील नाला हा जेसीबी द्वारे साफसफाई करुन घेण्यात येत आहे.
पावसाचे आगमन झाल्याने महत्वाच्या भागातील नालेसफाई तातडीने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. चाकण मधील बहुतांश नाल्यांमध्ये गवत, झाडे, झुडपे वाढल्यामुळे आणि कचरा साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी निर्माण झाली होती. सतत पाणी साचून राहिल्यामुळे डासांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून नाल्याची सफाई न झाल्यामुळे या नाल्यातील पाणी साचून राहत होते. आता संबंधित सर्वच नाल्याची सफाई सुरु असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होणार नाही अशी नागरिकांना अपेक्षा आहे. शहरातून जाणाऱ्या नाल्यातील आणि ओढ्यांचे पाणी नदीला जाऊन मिळते. अनेक ठिकाणी नैसर्गिक नाला बुजविण्याकरिता नाल्याच्या शेजारी मातीचे मोठे ढिगारे घालण्यात आले आहेत. त्यामुळे नाल्याची रुंदी कमी झाली आहे अशा नाल्यात माती आल्याने हा नाला तुंबून दुर्गंधी येत आहे. नागरी वसाहतीत नैसर्गिक नाले असून, नाल्यांमध्ये परिसरातील नागरिक घाण व कचरा टाकतात. परंतु या नाल्यांची कधीही स्वच्छता होत नसल्याने त्यात कचऱ्याचे ढीगच तयार झाले आहे. नगरपरिषदेने शहरातील या उघड्या नाल्यांचीही साफसफाई करणे गरजेचे आहे.