भीमाशंकर अभयारण्याला इकोसेंन्सेटिव्हचं कवच
भीमाशंकर अभयारण्याला इकोसेंन्सेटिव्हचं कवच
महाबुलेटीन न्यूज / अविनाश घोलप
भीमाशंकर : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने भीमाशंकर अभयारण्य इकोसेंसेटिव्ह झोन ( पर्यावरणदृष्टया संवेदनशील क्षेत्र ) जाहीर केलं असून यामध्ये पुणे, रायगड, ठाणे जिल्हयातील ४२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूचं माहेरघर असलेल्या या परिसराला तसेच हजारो प्राणी, पक्षी आणि जीवजंतू सोबत या अभयारण्याला यामुळे सुरक्षा कवच मिळणार आहे.
भीमाशंकर अभयारण्य इकोसेंन्सेटिव्ह झोन जाहीर करण्याबाबत २५ जुलै २०१९ रोजी प्रारूप अधिसूचना जाहीर केली होती. या अधिसुचनेव्दारे इकोसेंन्सेटिव्ह झोनमध्ये समाविष्ट होत असलेल्या गावांचे आक्षेप व सूचना मागविण्यात आल्या होत्या. हा इकोसेंसेटिव्ह झोन करू नये, अशा स्वरूपाची लेखी म्हणणे ग्रामपंचायतींनी ग्रामसभा घेवून पाठविल्या होते. त्यानंतरही केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायु परिर्वतन मंत्रालयाने ५ ऑगस्ट २०२० रोजी हा इकोसेंन्सेटिव्ह झोन जाहीर केला आहे.
पर्यावरण दृष्टया संवेदनशील क्षेत्रामुळे या गावांमध्ये रासायनिक खतांचे कारखाने, मोठे विद्युत निर्मीती प्रकल्प, लाकूड कापण्याच्या मील, दगडाच्या खाणी, मोठे गृहनिर्माण प्रकल्प, करमणुकीच्या उद्देशाने बनविलेली उद्याने तसेच राखीव मोकळया जागेचा व्यवसायिक , निवासी किंवा औद्योगिक उपक्रमांसाठी उपयोग केला जाऊ शकणार नाही.अभयारण्य पश्चिम घाटात येत असून मानवी वस्ती व चालू असलेल्या विकासात्मक घडमोडींच्या अतिजवळ असल्याने या अभयारण्याला संरक्षणाची व अभारण्याच्या जवळ सुरू असलेल्या उपक्रमांवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता असल्याच्या सूचना डॉ. के. कस्तुरीरंगन कमेटीने केल्या होत्या.
हे अभयारण्य पाऊस रोखण्यासाठी व जमिनीतील पाणी पातळी वाढविण्यास मदत करते तसेच जमिनीची होणारी धूप थांबवते तसेच या अभयारण्यातून भीमा, घोड, बुब्रा नदीचा उगम आहे. भीमा नदीवर चासकमान तर घोड नदीवर डिंभे धरण आहे, पुढे याच नद्यांचे पाणी उजनी धरणात जाते. त्यामुळे या अभयारण्याच्या चारही बाजूंचा विचार करून जैवविविधतेच्या दृष्टीने सुरक्षीत व संरक्षीत करणे आवश्यक असल्याने ०.०५ पासून १० किलोमीटर पर्यत भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य इको सेंसेटिव्ह झोन जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये अभयारण्य सोडून १०१.६२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ समाविष्ट करण्यात आले आहे. या क्षेत्रात पर्यावरणीय बाबींचा विचार करण्यासाठी ९ सदस्यांची देखरेख समिती तयार करण्यात आली असून याचे अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असणार आहेत. तर सदस्य सचिव जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक असणार आहेत. तसेच या समितीमध्ये ठाणे व रायगड जिल्हयाचे जिल्हाधिकारी, वन्यजीव पुणेचे उपवरसंरक्षक, रायगड व ठाणेचे उपवनसंरक्षक, पुणे, रायगड, ठाणे जिल्हयाचे नगर नियोजन अधिकारी, महाराष्ट सरकार पर्यावरण विभागाचे प्रतिनिधी, एक विषय तज्ञ, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असणार आहेत.
देखरेख समितीच्या अंतर्गत राज्य सरकारची वेगवेगळी खाती याचा मास्टर प्लॅन तयार करतील. यामध्ये जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, भूजल व्यवस्थापन याची कामे समाविष्ट असतील. तसेच या प्लॅनमध्ये इको सेंसेटिव्ह झोन मधील पुजास्थळे, वस्त्या, शेती क्षेत्र, सुपिक क्षेत्र, बागायती क्षेत्र, फळबागा, तलाव, उद्योग यांच्या सिमा निश्चीत केल्या जातील.
तसेच इको सेंसेटिव्ह झोन मध्ये अस्तीत्वातील रस्ते रूंदीकरण व मजबुतीकरण करणे, नवीन रस्ते तयार करणे, पायाभूत व नागरी सुविधांचे बांधकाम व नुतनीकरण, प्रदूषण न करणारे लघु उद्योग, स्थनिकांना रोजगार मिळूवन देणारे ईको टुरीझम, होम कॉटेज सारखे व्यवसाय पुर्वपरवानगी घेवून करता येणार आहेत. नवीन हॉटेल किंवा रिसॉर्ट बांधण्यासाठी परवानगी आवश्यक , प्लास्टिक कचरा, घन कचरा, जैव वैद्यकि य कचरा, ई-कचरा याचे व्यवस्थापन करावे लागणार, वाहन प्रदूषण रोखण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचे काटेकोर पालन केले जाईल, डोंगराच्या उतारांचे संरक्षण करण्यासाठी यावर कोणत्याही बांधकामाला परवानगी नसणार आहे.
भीमाशंकर अभयारण्यात पुणे, ठाणे व रायगड जिल्हयातील क्षेत्र मिळून १३०.७८ चौरस किलोमीटरमध्ये १६ सप्टेंबर १९८५ साली अस्तित्वात आले. या अभयारण्यात महाराष्टाचा राज्य प्राणी शेकरू आढळतो तसेच बिबटया, सांबर, भेकर, हनुमान वानर, रानमांजर, खवले मांजर, मुंगूस, मोर, घुबड, शिकारा, हिरवे कबुतर अशा सस्तन प्राण्यांच्या २२ प्रजाती व जवळजवळ २५ सरपटणारे प्राणी व उभयचारांच्या अनेक प्रजाती आढळतात.
इकोसेन्सेटिव्ह झोन मध्ये येणारी गावे :
पुणे : जिल्हयातील जुन्नर तालुक्यातील फागुलगव्हाण, आंबोली, भिवडे बुद्रूक, भिवडे खुर्द, हातवीज, आंबेगाव तालुक्यातील डोण, आघाणे, नाव्हेड, तिरपाड, नानवडे, महाळुंगे तर्फे आंबेगाव, पिंपरी, तेरूंगण, खेड तालुक्यातील भिवेगाव, भोमाळे, खरपुड
रायगड : जिल्हयातील जाबरंग, राजापुर, टामभरे, सिंगढोल, धोत्रे, शिलार, पथराज, खांडस, अंभेरपाडा, नांदगाव
ठाणे : जिल्हयातील बालिवरे, डोंगरनाव्हे, जांबुुर्डे, खानीवरे, सकुरली, नारीवली, उचले, देहरी, खोपवली, मिल्हे, दुधांनोली, उमरोली खुर्द, दुर्गापुर, मध, रामपूर, पालू.
——-