पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहचली वीज… ● ऐतिहासिक घटनेचे ताशाच्या कडकडाटामध्ये स्वागत…
पुणे जिल्ह्यातील ‘या’ गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोहचली वीज…
● ऐतिहासिक घटनेचे ताशाच्या कडकडाटामध्ये स्वागत
● आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नाने स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांनी गावात लखलखाट..
महाबुलेटीन न्यूज । किरण वाजगे
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील आदीवासी भागातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या देवळे या गावातील दऱ्यावाडी या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच विजेची सुविधा पोहचविण्यात आली आहे.
गुरुवार, दिनांक १८ जून रोजी जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके, बाजार समितीचे सभापती संजय काळे, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, भाऊ देवाडे, तुळशीराम भोईर, काळू शेळकंदे, मारूती वायाळ, देवराम नांगरे गुरुजी, माऊली लांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता नारखेडे, उपअभियंता आनंद मुळे, तहसीलदार हनमंत कोळेकर, सहाय्यक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, किरण आरोटे, दऱ्यावाडी येथील ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत या वीज वितरण व्यवस्थेचे ऐतिहासिक लोकार्पण ताशांच्या कडकडाटात करण्यात आले.
जिल्हा नियोजन समितीच्या टी.एस.पी. योजनेअंतर्गत १८ लाख ५८ हजार रुपये निधी खर्चून या भागात १.३ किलोमीटर लांबीची उच्चदाब विज वाहिनी १९ पोल द्वारे तसेच २.६५ किलोमीटर लांबीची लघुदाब वीज वाहिनी ज्यावर ५६ पोल उभे आहेत अशा ६३ के व्ही ए क्षमतेचे रोहित्र येथे बसविण्यात आले आहे.