महाराष्ट्रमीडियामुंबईविशेष

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली : एस. एम. देशमुख

सरकारने पत्रकारांच्या तोंडाला पुन्हा पाने पुसली : एस. एम. देशमुख

महाबुलेटीन न्यूज 
मुंबई : महाराष्ट्रातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये होईल, अशी जोरदार चर्चा मुंबईत होती. पण तसे काहीच झाले नाही. राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्यातील पत्रकारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारच्या पत्रकारांप्रती असलेल्या उदासिन भूमिकेबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी तीव्र नापसंती आणि चिंता व्यक्त केली आहे. देशातील आठ राज्यांनी पत्रकारांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून जाहीर केले असले तरी महाराष्ट्र सरकारला पत्रकारांचे एवढे वावडे का? असा सवाल देशमुख यांनी केला आहे. 

याबाबत माहिती अशी आहे की, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला असला तरी त्यावर काहीच निर्णय झाला नाही. काही मंत्री, खासदार, आमदारांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र पाठवून देखील काही उपयोग झाला नाही. मराठी पत्रकार परिषदेने राज्यभर ई मेल पाठवा आंदोलन केले होते. एक हजार मेल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. उपयोग होत नाही म्हटल्यावर परिषदेने आत्मक्लेष आंदोलन करून घरी बसून 2000 पत्रकारांनी उपवास केला. तरीही सरकार ढिम्म आहे. सरकारच्या मनात पत्रकारां बद्दल एवढी अढी का? असा सवाल एस. एम. देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 

सरकारने पत्रकारांना वाऱ्यावर सोडले असले तरी कोरोना पत्रकारांचा पिच्छा सोडायला तयार नाही. आज अक्कलकोट येथील पत्रकार शंकर हिरतोट यांचं कोरोनानं निधन झालं. त्यामुळे कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांची संख्या आता 124 झाली आहे. जवळपास 300 पत्रकार राज्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना कोणत्याच चांगल्या सुविधा मिळताना दिसत नाहीत.

सरकार जाणीवपूर्वक पत्रकारांबद्दल सकारात्मक निर्णय घेत नसेल, तर पत्रकारांना ठोस भूमिका घ्यावी लागेल. यापुढे काय करायचे याचा निर्णय घेण्यासाठी शनिवारी सकाळी 10 वाजता ऑनलाईन बैठक होत आहे. त्यात पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी दिली.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!