शहीद भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना भारतरत्न द्यावे…! ● ९० व्या राष्ट्रीय शहीद दिनाच्या दिवशी क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू मेमोरियल ट्रस्टची मागणी…
महाबुलेटीन न्यूज
राजगुरूनगर : स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक, शहीद ए आजम भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांचा ९० वा राष्ट्रीय शहीद दिवस, २३ मार्च… क्रांतिवीर राजगुरु यांच्या जन्मस्थळीं राजगुरुनगर येथे कोरोनाचे सर्व नियम पाळून, साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यावेळी शहीद दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे यांनी भारत सरकारकडे शहीद ए आजम भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना “भारतरत्न” हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी एका विशेष निवेदनाद्वारे केली.
भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांचे बलिदान सर्वोच्च झाले असल्याने आणि भारत देशाला अहिंसा व सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळालेले असल्याने तसेच अत्यंत कोवळ्या वयात या तिघांचे सर्वोच्च बलिदान झालेले असल्याने, १०० रुपयाच्या नोटेवर भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांना स्थान देण्यात यावे, अशीही मागणी ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल पाचारणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तशा प्रकारच्या सह्यांचे पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविलेले आहे.
तसेच पुणे एअर पोर्टला क्रांतिवीर राजगुरु यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेली आहे. निवेदनावर अध्यक्ष विठ्ठल पाचांरणे, उपाध्यक्ष भानुदास येळवंडे, सचिव नितीन गायकवाड, खजिनदार शिवाजी सोनवणे, प्रमुख विश्वस्त संतोष शिंदे, अशोक कोरडे, सतीश राक्षे, हेमंत जैद, एकनाथ करपे, कैलास येळवंडे इत्यादी विश्वस्तांच्या सह्या आहेत.
आजपर्यंत कोणत्याही क्रांतिकारकाला भारत देशाचा “भारतरत्न” हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला नाही. अपेक्षित क्रांतिकारक नेहमी उपेक्षित राहिल्याची खंत ट्रस्टचे अध्यक्ष आणि क्रांतिकारकांचे अभ्यासक विठ्ठल पाचारणे यांनी व्यक्त केली.
——————————-