लातूर जिल्ह्यात 15 ते 30 जुलै दरम्यान पुन्हा लॉकडाऊन : पालकमंत्री अमित देशमुख
महाबुलेटीन नेटवर्क : ओमप्रकाश तांबोळकर लातूर : जिल्ह्यात अलीकडच्या काळात वाढत चाललेला कोविड१९ प्रादुर्भाव लक्षात घेता १५ जुलै पासून जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी घोषित केले आहे. या संदर्भातील अधिक तपशील जिल्हाधिकारी जी. श्रीकांत लवकरच जाहीर करतील असे त्यांनी म्हंटले आहे.
अनलॉक २ च्या काळात बऱ्याच व्यवस्था सुरू झाल्या आहेत, मात्र या काळात रेडझोनमधून अनेक प्रवाशी जिल्ह्यात आले आहेत परिणामी कोविड१९ चा प्रादुर्भाव वाढला आहे, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ही साखळी तोडणे आवश्यक बनले आहे. एकंदरीत परिस्थितीचा विचार करता संभाव्य धोका टाळण्यासाठी लातूर जिल्ह्यात 15 ते 30 जुलै दरम्यान पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी म्हंटले आहे. लॉकडाऊन मध्ये कोणत्या सुविधा कशा प्रकारे सुरू राहतील, याचा तपशील जिल्हाधिकारी जी. श्रीकांत लवकरच जाहीर करतील असे त्यांनी सांगितले.

