वृक्षाच्या मुळाशी अस्थि विसर्जन करून तांबे परिवाराने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश
महाबुलेटीन न्यूज
राजगुरुनगर : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वरुडे गावचे प्रसिद्ध उद्योजक व हनुमान मंदिर समितीचे अध्यक्ष कै. साहेबराव विठ्ठलराव तांबे पाटील यांचे दिनांक दुःखद निधन झाले असता त्यांच्या स्मरणार्थ अस्थींचे नदीत विसर्जन न करता वृक्षाच्या मुळाशी अस्थि विसर्जन करून तांबे परिवाराने स्मृती वृक्ष लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
पर्यावरण जागर प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) या संस्थेचे कार्यकर्ते एकनाथ वाळुंज यांनी परंपरेप्रमाणे नदीपात्रात अस्थी व रक्षा विसर्जनाने पर्यावरणास मोठी हानी पोहोचते व नदीचे पाणी दूषित होते, हे तांबे कुटुंबियास समजावून सांगितले तसेच पर्यावरण जागर प्रतिष्ठानचा उपक्रम समजाऊन सांगितला. कै. साहेबराव तांबे यांचे चिरंजीव सचिन तांबे व संपूर्ण तांबे परिवार, नातेवाईक यांनी अस्थीचे विसर्जन नदी पात्रात न करता अस्थी व रक्षा जमिनीत खड्डे घेऊन त्यात टाकून मग त्यावर वृक्षारोपण करण्याचे ठरविले.
वृक्षारोपणासाठी पर्यावरण जागर प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) संस्थेचे अध्यक्ष किरणशेठ मांजरे, सचिव राजन जांभळे, सदस्य राष्ट्रपती पदक विजेते शिक्षक जी. र. शिंदे, प्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकनाथ वाळुंज, तसेच सेवानिवृत्त डीवायएसपी भीमराज मंडले, तांबे कुटुंबीयांचे जावई चंद्रकांत नाणेकर, सेवानिवृत्त वनक्षेत्रपाल बाळासाहेब गवते, माजी सरपंच भालचंद्र रोडे आणि तांबे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. किरणशेठ मांजरे तसेच जि. र. शिंदे यांनी पर्यावरण रक्षणाच्या या उपक्रमाबद्दल माहिती सांगून तांबे कुटुंबीयांनी वरुडे गावात प्रथमच या उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद दिले. सरपंच भालचंद्र रोडे यांनी आभार मानले.