महाराष्ट्र कृषी दिन म्हणून “या” मुख्यमंत्र्यांची जयंती केली जाते साजरी
महाबुलेटीन न्यूज नेटवर्क
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून त्यांची जयंती महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्र शासनाने कृषि दिन हा 1 जुलै रोजी वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त घोषित केला आहे. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक ( Vasantrao Naik ) यांचा जन्मदिन (1 जुलै ) ‘महाराष्ट्र कृषी दिन’ ( Maharashtra Krishi Din ) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी 1965 मध्ये सांगितले होते.
वसंतराव नाईक यांच्या कृषीक्षेत्रातील योगदानाचा सन्मान
वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. ‘शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या जिव्हाळ्याचे. अभ्यासाचे विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. 1972 च्या दुष्काळाचं संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारलं आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. ‘रोजगार हमी योजने’तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. ‘संकटाच्या काळात शासकीय मदतीचे धोरण लवचिक असले पाहिजे’ हा विचार त्यांनीच दिला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण ‘कृषीदिन’ म्हणून साजरा करतो.