कृषीलातूरविशेष

लातुर जिल्ह्यात पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी – तहासिलदारांकडून पहाणी..

महाबुलेटीन नेटवर्क / ओमप्रकाश तांबोळकर
लातुर : जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या हंगामात शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीन पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस व वातावरण असतानाही जमिनीत टाकलेले बियाणे उगवलेच नसल्याने लातुर जिल्ह्यातील शिरूरअनंतपाळ तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
त्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी  मागणी भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी तहसिलदार यांच्याकडे लेखी निवेदन देवुन केले होते, याची दखल घेवुन शिरूरअनंतपाळ येथील तहसिलदार अतुल जटाळे यांनी येरोळ येथील शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन सोयाबीन न उगवल्याची पहाणी करुन कृषी विभागाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
तालुक्यातील  येरोळ, डिगोळ, सोनारवाडी, सुमठाणा , नागेवाडी, बोळेगाव बु., चामरगा व अन्य गावातील शेतकर्‍यांनी आपल्या शेतात सोयाबीनची लागवड केली होती. सोयाबीन बीज उगविण्यासाठी आवश्यक असणारा पाऊस, तापमान आदी पोषक आणि अनुकूल वातावरण असतानासुध्दा जमिनीतील बीज उगवले नाही. यामुळे  तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे आधीच कर्जाचा डोंगर असताना शेतकर्‍यांना पुन्हा एकदा आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार आहे.
शेतकर्‍यांनी घरच्या बियाणासह बाजारात वेगवेगळ्या सोयाबीन उत्पादक कंपन्यांकडून बियाणे खरेदी केलेले आहेत. तसेच शेतात लागवड करताना बियाण्यांसोबतच खते, मजुरांची मजुरी व इतर खर्च लक्षात घेता, शेतकर्‍यांना प्रत्येकी कमीतकमी ५० हजार रूपयांच्या जवळपास खर्च आला आहे. मात्र, हे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकर्‍यांचा सर्व खर्च वाया गेला आहे. संबंधित शेतकर्‍यांनी कृषी विभागाला याविषयी लेखी तक्रारी दिल्या आहेत.
शेतकर्‍यांकडून मिळालेल्या लेखी तक्रारींच्या आधारावर तहसिलदार अतुल जटाळे , कृषी मंडळ अधिकारी शिवप्रसाद वंलांडे व कृषी सहाय्यक ओम अंधारे यांनी येरोळ येथील शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करुण तहसिलदार अतुल जटाळे यांनी बियाणे न उगवलेल्या शेतकर्‍याची कृषी विभागाने पहाणी करुण पंचनामे करावेत असे आदेश दिले .
यावेळी शिरूरअनंतपाळ तालुका भाजपचे अध्यक्ष मंगेश पाटील, राष्ट्रवादीचे नेते जहरूद्दीन शेख, शेतकरी मच्छिंद्र भालेकर, विश्वनाथ गंभीरे पाटील, पाशा कोतवाल, गणेश भालेकर, व्यकंटराव भालेकर व गावातील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!