भांबोली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची शुक्रवारी निवडणूक : तर्कावितर्कांना आले उधान
महाबुलेटिन नेटवर्क/दत्ता घुले
शिंदे वासुली : खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी टप्पा दोन मधील भांबोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. भांबोलीचे सरपंच सागर निखाडे यांनी राजीनामा दिल्याने उद्या सदस्यांमधून निवडणूक होणार आहे.
ऑक्टोबर २०१७ मध्ये भांबोली ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यावेळी जनतेमधून सागर तुकाराम निखाडे यांची थेट सरपंचपदी निवड झाली होती. ग्रामपंचायतीच्या तीन वॉर्डमधून सात सदस्य निवडून गेले होते. आणि ही सर्व निवडणुक भांबोली ग्रामस्थांच्या प्रयत्नाने बिनविरोध झाली होती. गावात ग्रामस्थांनी सरपंचपद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याचा निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर सागर निखाडे यांनी आपल्या सरपंच पदाचा ठरल्याप्रमाणे ३ जून राजी राजीनामा दिला. परंतु नविन शासन निर्णयानुसार थेट सरपंच निवड रद्द झाल्याने पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या सात सदस्यांमधूनच सरपंच निवड होणार आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी इच्छूक असणाऱ्या व गाव पुढाऱ्यांवर नामुष्की ओढवली आहे. कारण गावात दोन गट आहेत. मागील निवडणूक थेट जनतेतून सरपंच निवड होती म्हणून एकमताने निवडणूक बिनविरोध झाली होती. परंतु आता सदस्यांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंचपदाची चूरस वाढली आहे.
ग्रामपंचायतीमध्ये निवडून गेलेले सात सदस्य आणि थेट सरपंच असे आठ लोकप्रतिनिधी होते. त्यात सात पैकी एका सदस्याने काही महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे. तसेच सरपंचांनी राजीनामा दिला असून थेट सरपंच निवड रद्द झाल्याने त्या माजी सरपंचांना निवडणुकीत सहभागी होता येणार नाही. सध्या ग्रामपंचायतीमध्ये फक्त सहा लोकप्रतिनिधी असून दोन्ही गटाचे प्रत्येकी तीन सदस्य आहेत. त्यामुळे निवडणूक अधिक चूरशीची होणार यात शंका नाही.
भांबोलीत दोन्ही गटाकडे प्रत्यकी तीन सदस्य असल्याने ही निवडणूक चिठ्ठीवर होणार का? सदस्य पळवा पळवी होऊन कोणत्या गटाचा सरपंच होणार ? कोण बाजी मारणार? भांबोली व परिसरातील गावांमध्ये अशा तर्कावितर्कांना उधान आले आहे.
तसेच जनतेतून निवडून गेलेल्या सरपंचांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी राजीनामा दिल्याने इच्छूकांची मोठी गोची आहे. तर स्वप्नातही विचार केला नव्हता अशा कुणाला तरी सरपंचपदाचा अलभ्य लाभ मिळणार आहे. त्यामुळे गावात सरपंच निवडणूकीबाबत थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिती आहे.