युवा क्रांतीने दिला चिमुकल्या आराध्याला पुनर्जन्म…
महाबुलेटीन न्यूज : शैलेश काटे
इंदापूर : चहाच्या एका आमंत्रणात पाच वर्षे वयाच्या एका चिमुकलीच्या आयुष्याला ग्रासून टाकणा-या आजाराची माहिती मिळाल्यानंतर युवा क्रांती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तो आजार समूळ गाडून टाकण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत चिमुकल्या आराध्याच्या आयुष्याचा निरोगी अध्याय लिहिला.
या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, इंदापूरात रहाणा-या गवंडीकाम करुन उपजीविका करणा-या संतोष भोंग यांच्या पाच वर्षे वयाच्या आराध्या नावाच्या गोड बालिकेच्या ह्रदयाजवळ गाठ असल्याचे तपासणीअंती निष्पन्न झाले होते. ती गाठ काढण्यासाठी करावयाच्या शस्त्रक्रियेसाठी चार ते पाच लाख रुपये खर्च येणार होता. गाठ कधी ही फूटु शकते, फुटल्यानंतर केवळ दोन दिवसांच्या उपचारावरच आराध्याचे भवितव्य अवलंबून असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले होते.
भाड्याच्या घरात रहाणा-या व गवंडीकामावर प्रपंच चालवणा-या संतोष भोंग यांच्यासाठी एवढी रक्कम गोळा करणे ही केवळ अशक्यप्राय होती. कोणाचे सहकार्य मिळत नव्हते. कोरोनाच्या साथीमुळे योजनेमध्ये बसवून ही शस्त्रक्रिया होईल, असे ही काही दिसत नसल्याने, आराध्या आहे तो पर्यंतच आपली आहे असे समजून तिच्या आई वडिलांनी आशा सोडून दिली होती.
तथापि भोंग ज्यांच्या खोल्यांमध्ये भाड्याने रहात होते त्या नितीन पासगे व सुधीर पाजगे या युवा क्रांती प्रतिष्ठानमध्ये कार्यरत असणा-या बंधुंनी गेल्या महिन्यात युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक प्रशांत सिताप,अध्यक्ष अस्लम शेख व त्यांच्या सहका-यांना मागच्या महिन्यात चहाला घरी बोलावले. त्यांना आराध्याची फाईल दाखवली. भारती विद्यापिठ हॉस्पिटलमध्ये आराध्याची तपासणी झाली होती. तिथेच तिच्यावर शस्त्रक्रिया होवू शकते. पण खर्चाच्या आकड्यामुळे सारे ठप्प झाले आहे, ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर सिताप व त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही ही करुन आराध्याला गमवायचे नाही या एकमेव उद्देशाने पुढच्या हालचालींना प्रारंभ केला.
या कामासाठी सिताप यांच्या डोळ्यासमोर इंदापूरचे भूमिपूत्र एनएसयुआयचे माजी प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयसिंह चौधरी यांचे नाव आले. त्यांनी ॲड. चौधरी यांच्याशी संपर्क साधला. या प्रकरणाची पूर्ण माहिती दिली. ॲड. चौधरी यांनी आपल्या चिरपरिचित शैलीत, मला दहा मिनिटे वेळ द्या. नक्की काहीतरी करतो म्हणत फोन ठेवला. पाच मिनिटांनी परत त्यांचा फोन आला. त्यांनी भारती विद्यापीठामधील डॉक्टरांचे नाव दिले. रुग्णास भेटायला पाठवा. काम होईल असे सांगितले. सिताप यांनी पैशांची अडचण सांगितली. त्यावर पाठवून द्या दादा मी पुढचे बघून घेतो, असे ॲड. चौधरी यांनी ठामपणे सांगितल्यानंतर पुढचे सोपस्कार झाले. शस्त्रक्रियेची तारीख ठरली. एबी निगेटिव्ह गटाच्या रक्ताच्या दोन पिशव्या लागतील असे ही डॉक्टरांनी सांगितले.
पुण्यात गेल्यानंतर त्या गटाच्या रक्ताच्या पिशव्या मिळेना. आराध्याच्या आईने सिताप यांच्याशी संपर्क साधला. अडचण सांगितली. सिताप यांनी त्याबाबत फेसबुकवर पोस्ट टाकली. दहा मिनीटात मनीष जाधव, समाधान ठोंबरे, नितीन पासगे हे तीन रक्तदाते कोरोनाच्या महामारीत देखील स्वखर्चाने पुण्याला येण्यास तयार झाले. ही जोखीम पत्करण्याआधी सिताप यांनी ॲड.विजयसिंह चौधरी यांच्याशी संपर्क साधला. रक्तदाते घेवून पुण्याला येत असल्याचे सांगितले. तथापि टेन्शन घेऊ नका. मला दहा मिनीट द्या, असे ॲड. चौधरी यांनी सांगितले. दोन मिनीटात रिटर्न फोन केला. रक्ताची तरतुद झालीय, हे आवर्जून सांगितले. आराध्यावरची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सारे व्यवस्थित झाले.
●● दि. ४ ऑक्टोबर रोजी ॲड. विजयसिंह चौधरी यांचा वाढदिवस होता. तो कोरोनामुळे साजरा करायचा नाही, असे ॲड.चौधरींनी ठरवले होते. मात्र ॲड. चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त आराध्याचा सत्कार करून तिच्या हस्ते केक कापून युवा क्रांती प्रतिष्ठानने ॲड. चौधरी यांना ऊदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.●●