नारायणगावात तमाशा पंढरीची परंपरा कायम यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राहुट्या उभ्या, बुकिंगला सुरुवात
महाबुलेटीन न्यूज | अतुल कांकरिया
नारायणगाव :
महाराष्ट्राची पारंपारीक लोककला जोपासणाऱ्या नारायणगाव येथील तमाशा पंढरीत लोकनाटय तमाशा फडांच्या राहुटयांचे आगमन झालेले आहे. येथील तमाशा पंढरीत राज्यातील कानाकोपऱ्यातून ग्रामस्थ, स्थानिक पुढारी, पाटील, पंच, यात्रा उत्सव कमिटीचे प्रमुख यांची रेलचेल सुरू होणार आहे. राज्यात सुरू झालेल्या यात्रा-जत्रांसाठी लोकनाटय तमाशा खेळांच्या सुपाऱ्या (बुकींग) याठिकाणी सुरू असून या तमाशा राहूटयांचे वास्तव्य अक्षय तृतीयापर्यंत राहणार आहे.
पारंपारीक पध्दतीने लोकनाटय तमाशाच्या खेळातून महाराष्ट्राची लोककला जोपासणाऱ्या तमाशा फडांच्या राहुट्यांचे नारायणगावात पुणे-नाशिक महामार्गावरील सभापती कॉर्नरच्या पुढे आगमन झाले आहे. दरवर्षी नारायणगावचे ग्रामदैवत श्रीक्षेत्र मुक्ताबाई व काळोबा देवस्थान या यात्रेचे औचित्य साधून राज्यातील नामांकित छोटया-मध्यम व मोठया फडांचे मालक येथे राहुटया (कार्यालय) उभारून आपल्या व्यवसायाची सुरूवात करतात. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात या राहुटयांचे आगमन होते.
यंदाच्या वर्षी उप सरपंच योगेश पाटे व भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष खैरे यांच्या माध्यमातून आत्तार बंधू यांच्या मालकीच्या जागेत राहुटयांची उभारणी करण्यात आलेली आहे. या राहुटया नारायणगाव पंढरीतच उभाराव्यात यासाठी उपसरपंच योगेश पाटे व ग्रामस्थांच्या सहकार्याने नारायणगाव पंढरीत उभारण्यात येणा-या तमाशा राहुटयांची परंपरा कायम राहीली आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी नळकनेक्शन व विजेची सोय केलेली आहे.
गेल्या १० दिवसांत तमाशा पंढरीत सुमारे ३२ राहुटयांचे आगमन झालेले असून यामध्ये स्व. विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर, मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, मालती इनामदार, हरिभाऊ बढे सह शिवकन्या बढे नगरकर, चंद्रकांत ढवळपूरीकर सह किरण कुमार ढवळपूरीकर, भिका-भिमा सांगवीकर, अंजली राजे नाशिककर, संध्या माने, आनंद जळगावकर, काळू-बाळू लोकनाटय तमाशा मंडळ, शांताबाई संक्रापूरकर, प्रकाश अहिरेकर, जगन कुमारसह हौसा वेळवंडकर, बाळ आल्हाट नेतवडकर, छाया खिलारे, दीपाली पुणेकर, दत्ता महाडिक पुणेकर, दत्तोबा तांबे शिरोलीकर, सविता पुणेकर, शकुंतला नगरकर आदी तमाशाच्या राहुटया उभारण्यात आलेल्या आहेत.
यंदाच्या वर्षी यात्रा जत्रा व बैलगाड्यामुळे तमाशा क्षेत्राला चांगले दिवस येतील असा विश्वास तमाशा फड मालकांनी व्यक्त्त केला आहे. एका तमाशा फडात सुमारे ५० ते ७० च्या पुढे कलावंत व कर्मचारी असतात. तसेच राज्य शासनाने तमाशाला परवानगी दिली असता अनेक जिल्ह्यात स्थानिक पोलीस अधिकारी तमाशा कार्यक्रमांना, यात्रा कमिटीना परवानगी देत नाहीत. जागरण गोंधळ कार्यक्रम करणारे धार्मिक कार्यक्रमाबरोबर तमाशा कार्यक्रम सादर करू लागले आहेत. तर दुसरीकडे मात्र पोलीस विभाग राजकीय सभा, मेळावे, प्रचारसभा, निवडणुका, लग्न कार्य आदींना डोळे झाकून परवानगी देत आहे. असा दुजाभाव केला जात आहे.
याबाबत तमाशा मालक, कलावंत व चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बैलगाडा शर्यती सुरु झाल्या असल्याने जत्रा यात्रा उत्सवाला सुरुवात झाली आहे. यामुळे तमाशा क्षेत्राला आर्थिक उभारी आली आहे. यासाठी शासनाने पूर्णवेळ ढोलकी तमाशा व हंगामी तमाशा फड मालक व कलावंताना यंदाच्या वर्षी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी तमाशा फड मालक अविष्कार मुळे, मोहित नारायणगावकर, मुसा इनामदार, संभाजी राजे जाधव यांनी केली.