स्पर्धा परीक्षा लेखमाला भाग ३ : परीक्षेचे स्वरूप
मागील आठवड्यात UPSC चा निकाल आला, सर्व यशस्वीतांचे अभिनंदन. हा निकाल UPSC च्या मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्या एकत्रित गुणांवर अवलंबून असतो. “हे काय” हे समजून घेण्यासाठी या परीक्षेचे स्वरूप समजुन घेणे क्रमप्राप्त आहे.
UPSC नागरी सेवेची परीक्षा तीन टप्यात घेते. यात पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत व्यक्तिमत्त्व चाचणी यांचा समावेश होतो. याचे आपण विस्तृत विवेचन या लेखात पाहणार आहोत.
●पूर्व परीक्षा:
आयोगाकडून दरवर्षी सर्वप्रथम पूर्व परीक्षा घेतली जाते. यात दोन पेपरचा समावेश असतो.
१) सामान्य अध्ययन:
हा पेपर १०० प्रश्नांचा २०० गुणांसाठी असतो. यात सर्व विषयांचा उहापोह केलेला असतो. साधारणपणे यात इतिहास ( प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक) विशेषतः भारतीय स्वातंत्र्य लढा , भूगोल (भारत व जग) व नकाशावर आधारित प्रश्न , राज्यव्यवस्था/राज्यघटना, पर्यावरण , भारतीय कला आणि संस्कृती, अर्थशास्त्र , विज्ञान व तंत्रज्ञान आणि चालू घडामोडी यां विषयांवर प्रश्न विचारले जातात.
गेले काही वर्षे आयोगाकडून अभ्यासक्रमात दिलेल्या मुद्द्यांवर चालू असलेल्या घडामोडींवर प्रश्न विचारण्याचा कल आहे. म्हणून त्या पद्धतीने अभ्यासाची व्यूहरचना ठरवावी लागते. हे करत असताना ४०% मूळ विषयाचा अभ्यास व ४०% चालू घडामोडींचा अभ्यास व २०% सराव परीक्षा असा पॅटर्न विध्यार्थी राबवू शकतात. पूर्व परीक्षेच्या मेरिटसाठी या पेपरला मिळालेले गुण विचारात घेतले जातात.
२) CSAT:
CSAT चा अर्थ CIVIL SERVICE APTITUDE TEST असा होतो. या पेपरमध्ये 80 प्रश्न 200 गुणांसाठी असतात. यात गणित, तर्कावर आधारित प्रश्न, निर्णयक्षमता आणि उताऱ्यावर आधारित प्रश्नांचा समावेश होतो. हा पेपरला मिळणारे गुण पूर्व परीक्षेच्या मेरिटसाठी ग्राह्य धरले जात नाही. मात्र ३३% गुण मिळवणे अनिवार्य आहे. जर या पेपरला ३३% गुण मिळाले नाही तर सामान्य अध्ययनच्या पेपरला चांगले गुण मिळवूनही उमेदवार मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरतो. त्यामुळे उमेदवाराला या विषयावर सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.
परिक्षेचा हा टप्पा ओलांडल्यावर उमेदवाराला मुख्य परीक्षेला सामोरे जावे लागते. मुख्य परीक्षेला असणारे विषयांचे विस्तृत विश्लेषण आपण पुढील लेखात बघणार असल्याने आपण फक्त स्वरूप पाहणार आहोत.
●मुख्य परीक्षा:
१)मातृभाषा -३०० गुण
२)English – ३०० गुण
३)निबंध -२५० गुण
४)सामान्य अध्ययन -२५० गुण
५)सामान्य अध्ययन -२५० गुण
६)सामान्य अध्ययन -२५० गुण
७)सामान्य अध्ययन -२५० गुण
८)वैकल्पिक -१ -२५० गुण
९)वैकल्पिक -२ -२५० गुण
यातील क्रमांक १ व २ चे विषयाचे गुण हे अंतिम निकालात विचारात घेतले जात नसले तरी या विषयांना ३३% गुणांचा “जादुई आकडा” पार करावा लागतो. इतर विषयांना एकूण १७५० पैकी मिळालेल्या गुणांचा समावेश अंतिम निकालात केला जातो.
येथे वैकल्पिक विषय हा उमेदवाराला निवडावा लागतो. हा विषय उमेदवाराच्या आवडीचा व जास्तीत जास्त गुण मिळवणारा असला तर मेरिट ला फायदा होतो. यानंतर उमेदवाराने cut-off पेक्षा जास्त मार्क्स मिळवले की उमेदवाराला व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी बोलावले जाते.
●व्यक्तिमत्त्व चाचणी:
व्यक्तिमत्त्व चाचणी ही दिल्लीस्थित आयोगाच्या मुख्यालयात घेतली जाते. आयोगाकडून नियोजित पॅनल समोर आपल्याला मुलाखत वजा व्यक्तिमत्त्व चाचणीला सामोरे जावे लागते. यात उमेदवाराच्या सर्वांगीण गुणांची पारख केली जाते. ही चाचणी २७५ गुणांची असते.
अंतिम निकाल हा मुख्य परीक्षा व व्यक्तिमत्त्व चाचणी यांच्या एकूण गुणांवर आधारित असतो. उपलब्ध जागा व मिळालेले उमेदवार यांची सांगड घालून अंतिम निकाल घोषित केला जातो.
UPSC आयोगाच्या परीक्षा ह्या अवघड नसून मोठा आवाका असलेल्या आहेत. ज्याला हा आवाका “आवाक्यात” घेता येतो, तो यशवंत बनून सनदी अधिकारी बनतो.
(प्रा. मयूर दिलीप जायभाय )
MA,MBA(Mkt),NET, PGDFT.
Empanal Member at MCED.