पंचवीस वर्षीय तरुणाच्या अपघाती मृत्यूने चिंबळी गावावर शोककळा
महाबुलेटीन न्यूज : श्रीकांत बोरावके
चिंबळी (ता.खेड ) येथील अक्षय दिलीप जाधव ( वय २५ वर्षे ) या युवकाचे दि.६ रोजी अपघातात गंभीर जखमी झाल्यामुुळे उपचारा दरम्यान निधन झाले असून ऐन तारुण्यात उमदा तरुण गेल्याने संपूर्ण चिंबळी गावावर शोककळा पसरली आहे.
शुक्रवार ( दि.५ ) रोजी येथील गावठाण – चिंबळी फाटा रस्त्यावर झालेल्या दुचाकीं अन टेम्पोच्या अपघातात अक्षय गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारा करिता भोसरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने (दि.६) रोजी रुग्णालयाने त्याला मृत घोषित केले. त्याच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली असून गावातील सर्व दुकाने, व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अक्षय हा धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता होता. ढोल -ताशा पथक व बैलगाडा, संघटन क्षेत्रात त्याने नाव कमावले होते. तो उत्तम घोडेस्वार देखील होता.
त्याच्या मागे आजी, आजोबा, आई, वडील, चुलते, एक बहिण, एक भाऊ, चुलत भाऊ – बहिणी असा परिवार आहे. इंद्रायणी नदीवरील चिंबळी गाव स्मशानभूमित त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दरम्यान पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षातील आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, मित्र परिवार, नातेवाईक, बैलगाडा क्षेत्रातील मित्र परिवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐन तारुण्यात गावातील उमदा तरुण हरपल्याने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव यांचे ते चिरंजीव, खेड तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव, शरद जाधव यांचे ते पुुतणे, तर पै. नरेंद्र जाधव, बंटी जाधव यांचे बंधू होत.