एकतर्फी प्रेमातून हत्या केलेल्या नवविवाहित मुलीच्या प्रकरणाची केस अॅड. उज्ज्वल निकम घेणार
आमदार अॅड. निलमताई गोऱ्हे यांचा मुख्यमंत्री व गृह मंत्र्यांकडे पाठपुरावा
महाबुलेटीन नेटवर्क / विशेष प्रतिनिधी
जालना : जालना जिल्ह्यातील मंठा येथे एकतर्फी प्रेमातून एका नवविवाहित मुलीची 30 जून रोजी भरदिवसा गळा चिरून हत्या झाली. या प्रकरणाची केस अॅड. उज्ज्वल निकम हे घेण्यास तयार असल्याची माहिती आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. हे प्रकरण निकम यांच्याकडे सोपविण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठपुरवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जालना येथील एका नवविवाहित 19 वर्षाच्या मुलीची एकतर्फी प्रेमातून गावातीलच मुलाने गळा चिरून हत्या केली. या प्रकरणातील आरोपीवर मंठा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होऊन आरोपीला अटकही झाली आहे. याघटनेत वरिष्ठ वकील नेमण्याची मागणी होत होती. याबाबत जेष्ठ विधी तज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी ही केस घेण्याची विनंती मान्य केली, असल्याची माहिती आमदार गोऱ्हे यांनी दिली.
या हत्या प्रकरणाचा तपास पारदर्शक होत नसल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तसेच खा. संजय जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए. जे. बोराडे यांनी विधानपरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपासात कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, यासाठी परतूर पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे हा तपास देऊन जालना गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना या तपासात समाविष्ट करून घेण्यात यावे, अशी सुचना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांना नीलम गोऱहे यांनी केली आहे.