महिंद्रा कंपनीकडून कोरोना रुग्णांसाठी ७५ ऑक्सीजन बेडची हॉस्पिटल सुविधा सुरू
महाबुलेटीन न्यूज : हनुमंत देवकर
चाकण, पुणे : महिंद्रा कंपनीने ७५ व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी ह्या आपल्या सहयोगी संस्थेबरोबर म्हाळुंगे येथे खेड आणि हवेली तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी पहिल्या टप्प्यात ७५ ऑक्सीजन बेडची सुविधा डी सी एच सी (Dedicated COVID Health Care Center) केंद्रामध्ये सुरूब्ध करण्यात आली आहे.
कोरोना साथीमध्ये ऑक्सिजन बेडचा तुटवडा, त्याची वाढती मागणी आणि एकूणच ऑक्सिजनसाठी संपूर्ण पुरवठा व्यवस्था याची परिस्थिती अवघड होती. ही गरज ओळखून ७५ ऑक्सिजन बेडची सुविधा महिंद्रा कंपनीने उपलब्ध करून दिली. त्यामुळे येथील रुग्णांना मोठा दिलासा डी सी एच सी (Dedicated Health Care Center ) या सेंटरच्या माध्यामातून मिळणार आहे. खेड परिसरातील रुग्णांना बाहेर कुठेही जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी उदघाटनप्रसंगी सांगितले. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीही ह्या सुविधेचा मोठा फायदा खेड परिसरातील रुग्णांना होणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास महिंद्रा चाकण प्लांटचे प्रमुख नासिर देशमुख, खेडचे प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार श्रीमती सुचित्रा आमले, बीडीओ अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी बळीराम गाढवे, सभापती भगवान पोखरकर, खेड पंचायत समिती, महसूल आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
खेड आणि हवेली तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा परिषद पुणे आणि खेड पंचायत समिती यांचे साहाय्य घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. आजच्या घडीला या दोन्ही तालुक्यामध्ये साडेसहा हजाराहून अधिक कोरोना रुग्ण असून ह्या साथीमुळे १२५ हुन अधिक बळी गेले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटल बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन बेडसाठी पुणे किंवा पिंपरी-चिंचवडला धाव घ्यावी लागते. त्या अभावी काही रुग्ण दगावले देखील आहेत. २ ऑक्टोबर पासून तालुक्यातील गरजूंना ही मोफत सुविधा उपलब्ध झाली आहे.
लॉकडाऊन मध्येही महिंद्रा कंपनी येथील जनतेच्या मदतीला धावून आली. स्थलांतरित मजुरांसाठी अन्न वाटप, पोलीस आणि हॉस्पिटल प्रशासनास मास्क, फेस शिल्ड, सॅनिटाईझर्स आदी साहाय्य पुरविले. महिंद्रा कंपनी नेहमीच समाजाप्रती बांधिलकी जपत आलेली आहे आणि ह्या सुविधेच्या निमित्ताने कंपनी प्रशासनाने संस्थापकांच्या राष्ट्र आणि समाजाप्रती सेवा दृष्टिकोनाचा वारसा पुढे चालविण्याचा संकल्प सोडला आहे.