महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पडली; तरुणांच्या मदतीमुळे दोन महिला व तीन चिमुकल्यांचे प्राण वाचले.
खेड मधील घटना
महाबुलेटीन न्यूज : प्रभाकर जाधव
राजगुरुनगर (पुणे) : चासकमानच्या डाव्या कालव्यावरुन जात असताना राजगुरुनगर सातकरस्थळ ( ता. खेड ) येथे महिला चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार कालव्याच्या पाण्यात पडल्याची घटना आज ( दि. १३ सप्टेंबर ) दुपारी घडली. यावेळी स्थानिक तरुणांच्या मदतीने कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह दोन महिलांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र चासकमान धरणातून डाव्या कालव्यात ५५० क्यूसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाण्याच्या प्रवाहात कार वाहुन गेली आहे.
चासकमानच्या डाव्या कालव्यावरून जात असताना महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पडल्याची घटना घडली. यावेळी माजी सरपंच साधना सातकर यांनी ही गाडी पाण्यात पडताना प्रथमतः पाहिली. त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या अशोक सातकर, संदीप सातकर, तुषार सातकर, सुदर्शन मुळूक, माजी उपसरपंच सचिन सातकर, अविनाश खांगटे, ॠषीकेश सातकर आदी आठ ते दहा तरुणांनी तातडीने कालव्यात उडी मारून कारमधील तीन चिमुकल्या मुलांसह दोन महिलांना सुखरूप बाहेर काढले. यावेळी “नशीब बलवत्तर म्हणून वाचलो”, अशी भावना कार मधील महिलेने व्यक्त केली. तिने मदत करणाऱ्या स्थानिक तरुणांचे आभार मानले आहे.
कालव्याच्या बाजूने जाताना सदर महिलेचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कालव्याला कठडे नसल्याने कार कालव्याच्या पाण्यात पडली. स्थानिक तरुणांनी ही गाडी पाण्यात अडविण्याचा प्रयत्न केला मात्र चासकमानच्या डाव्या कालव्यातून पाचशे क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने
कार पाण्यात वाहून गेली आहे.
महिला चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात पडली; तरुणांच्या मदतीमुळे दोन महिला व तीन चिमुकल्यांचे प्राण वाचले. ☛…
Maha Bulletin News यांनी वर पोस्ट केले रविवार, १३ सप्टेंबर, २०२०